महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्पेशल : अनलॉकनंतरही मिठाईतला गोडवा परतेना, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम व्यवसाय, उद्योग यावर देखील होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा जात आहेत, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.

By

Published : Aug 14, 2020, 8:56 PM IST

Updated : Aug 15, 2020, 4:43 PM IST

sweet home business
अनलॉकनंतरची मिठाई व्यावसायिकांची परिस्थिती...

नागपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनलॉक झाल्यानंतरही अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. सध्या सण उत्सवाचे दिवस आहेत. अशात गोडधोड असल्याशिवाय सण, उत्सव साजरा केल्याचे वाटत नाही. परंतु अनलॉकनंतरही नागपुरातील मिठाई व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात अनेक छोटे मोठे मिठाई व्यावसायिक आहेत. मात्र, कोरोनामुळे मिठाईला मागणीच होत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अनलॉकनंतरची मिठाई व्यावसायिकांची परिस्थिती...पाहा स्पेशल रिपोर्ट

कोरोनामुळे संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम व्यवसाय, उद्योग यावर देखील होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा जात आहेत, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. नागपुरातही लॉकडाऊनचा फटका मिठाई व्यावसायिकांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात अनेक छोटे मोठे मिठाई व्यावसायिक आहेत. अनेकांची घरे याच व्यवसायावर चालत आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यापासून कोरोनामुळे मिठाईची विक्रीच बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ऐरणी दिवसाला १० ते १२ हजार रुपयांची मिठाई विक्री होत असे. परंतु, कोरोनामुळे ती आता २ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. यामुळे या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. यातील अनेकांचे घर देखील याच मिठाई व्यवसायावर अवलंबून आहेत. परंतु, आता मात्र व्यवसाय ठप्प असल्याने कुटूंबावरच उपासमारीची वेळ आली असल्याचे मिठाई विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनापूर्वी दुकानात ६ लोकं काम करत असतं. आता मात्र मिठाईची विक्रीच होत नसल्याने २-३ इतकेच कामगार ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनचा फटका विक्रीबरोबर इतरही घटकांवर झाल्याचे दिसून येत आहे.

ऐरणी सण उत्सव म्हटलं की मिठाई खरेदी प्रचंड होत होती. त्यानुसारच या मिठाई व्यावसायिक मिठाई निर्मिती करत असतं. जिथे सणाच्या काळात ३०० ते ५०० किलो मिठाई बनवावी लागत असे, परंतु तिच मिठाई निर्मिती आता ३० ते ४० किलोंवर येऊन ठेपली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. त्याचबरोबर याच सणाच्या दिवसात एक व्यक्ती कमीत कमी १ किलो मिठाई खरेदी करत असतं, परंतु आता मात्र ती देखील नाममात्र झाल्याचे या विक्रेत्यांचे मत आहे. अशावेळी ग्राहक देखील प्रत्यक्ष खरेदी टाळत आहेत. त्यामुळे मिठाई विक्री होणार कशी ? असा सवालही मिठाई व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे ग्राहकांकडून देखील कोरोनाच्या भीतीमुळे मिठाई खरेदी टाळत असल्याचे सांगितले जात आहे. दुकानांमध्ये सँनिटायझरची सोय, स्वच्छता प्रत्येकच दुकानदारांकडे मिळत नसल्याने विश्वासातील विक्रेत्यांकडून मिठाई खरेदी करत असल्याचे ग्राहकांचे मत आहे. कोरोनामुळे सर्वांच्याच मनात प्रचंड भीती दडलेली आहे. अशावेळी ती भीती कमी होईल तेव्हाच मिठाई व्यावसायिकांच्या विक्रीला वाव मिळेल, अशा प्रतिक्रिया मिठाई विक्रेत्यांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर मिठाई विक्रीत कमालीची घट झाल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. अशावेळी अनलॉक होवून काहीच फायदा नाही, तर लोकांच्या मनातील भीती घालवणे महत्त्वाचे असल्याचे मिठाई विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.

Last Updated : Aug 15, 2020, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details