नागपूर- लॉकडाऊन अनलॉक व्हायला सुरवात होताच नागपुरातील गुन्हेगार मोकाट सुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात लॉकडाऊन नेमकं जनतेसाठी खुला करण्यात आले की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नागपुरात तब्बल 14 खुनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात नागपुरातील गुन्हेगारी कमी झाली आहे, मात्र गेल्या आठ दिवसात खुनाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा पोलीस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी केला आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मते शहरात घडलेल्या खुनाच्या घटनांमागे पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत असला तरी क्षणिक वादातून घडणाऱ्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत सर्व गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच बिळात लपलेले गुन्हेगार पुन्हा मोकाट झाले आहेत. त्यामुळे उपराजधानी नागपूरचा गुन्हेगारी आलेख पुन्हा चढायला लागला आहे. तसं पाहिलं तर नागपुरात रक्त रंजित घटनांची सुरवात २८ मे पासून झाली आहे. नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत एका अनोळखी मजुराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. चिमूटभर तंबाखूसाठी प्रवासी मजुराचे अमित काकडे व पुरुषोत्तम विश्वकर्मा यांच्यासोबत भांडण झाले आणि याच वादातून मद्यपान करून शुद्धी हरपलेल्या अमित काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्माने त्या मजुराच्या डोक्यावर सिमेंटचा मोठा दगड मारून त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असली, तरी मृतकाची ओळख अद्याप पटली नाही. त्यानंतर खुनाची सुरू झालेली मालिका अजूनही थांबवण्यात पोलीस विभागला सपशेल अपयश आलेलं आहे. त्यानंतर जणू एक दिवसाआड खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत. केवळ १७ दिवसांच्या कालावधीत नागपूर शहरात एका मागे एक अशा ११ खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर लूट आणि सामूहिक बलात्काराच्या प्रत्येकी एक अशा दोन अत्यंत गंभीर घटना घडल्या आहेत. कोरोनाशी लढणारा नागपूर जिल्हा गुन्हेगारीमुळे रक्तरंजित होताना दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारांनी शांतता भंग केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जून महिन्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा क्रम
०१) १ जून रोजी लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालधक्का या ठिकाणी धीरज साळवे नावाच्या तरुणाची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केली. या घटनेचे आरोपी अद्यापपर्यंत अटक झाले नसून हत्येचे कारणही पोलीस शोधू शकलेले नाहीत.
०२) १ जून रोजीच नागपुरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सिव्हिल लाईन्स परिसरात बाईकवर आलेल्या सहा लुटारूंनी ब्रिन्क्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून १८ लाख ३१ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. भर रस्त्यात दुपारी दोन वाजता झालेल्या या लुटीनंतर नागपुरात सुरक्षा व्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. गुन्हे शाखेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत १२ तासाच्या आत सहा पैकी चार लुटारूंना अटक करत लुटीची साडे सहा लाख रुपयांची रोकड जप्त केली.
०३) २ जूनच्या पहाटे कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत भुलेश्वर नगर परिसरात राज डोरले या तरुणाची डोक्यावर लाकडी बॅटने हल्ला करून आणि गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. राज डोरले हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी होता. राज याचे मुकेश नारनवरे आणि अंकित या तरुणांसोबत जुने वाद होते. घटनेच्या दिवशी राजला एकटे साधून मुकेश नारनवरे आणि अंकित यांनी डाव साधत त्याची हत्या केली होती. हत्येनंतर दोघे स्वतः पोलीस स्टेशनला चालत जाऊन पोलिसांना शरण गेले होते.
०४) ३ जूनच्या रात्री यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत फुकट नगर परिसरात अन्नू ठाकूर या सराईत गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी हत्या केली. मृतक अन्नू ठाकूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच जेलमधून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आलेल्या अन्नू ठाकूरपासून जुन्या वादाचे उट्टे काढण्यासाठी मोहम्मद कलीम उर्फ मक्खन अन्सारी, मेहबूब अली आणि उस्मान अली या प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांनी हत्या केली.
०५) फुकट नगर मध्ये झालेल्या गुंडाच्या हत्येचे आरोपी अटक करून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. ४ जूनच्या दुपारी प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोपाळनगर परिसरात कार्तिक साळवी या केबल ऑपरेटरची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. कार्तिक बाईकवरून जात असताना दोन तरुणांनी त्याचा पाठलाग करत चालत्या बाईकवर डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करत त्याला खाली पाडले आणि एकानंतर एक असे डोक्यावर अनेक वार करत त्याची हत्या केली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
०६) नागपूर शहरात गुन्हेगारीमुळे रोजच रक्त सांडत असताना ग्रामीण भागात ही गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गृहमंत्री आणि देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातच एका कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली आहे. २९ मे रोजी काटोलमध्ये मुख्तार अली इराणीची हत्या करण्यात आली. मुख्तार अली कुख्यात गुन्हेगार होता. घटनेच्या दिवशी मुख्तार अली याने चिकन दुकानावर जाऊन दादागिरी करत उधारीवर चिकन मागितले होते. मात्र, दुकानदाराने ते देण्यास नकार दिल्यानंतर मुख्तार अलीने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुकानातील कामगाराच्या पाठीवर चाकुने गंभीर वार करत त्याला जखमी केले होते. रात्री पेठ बुधवार परिसरातील हेटी पुलावर पुन्हा उफाळून आलेल्या वादात मात्र सहा जणांनी मिळून मुख्तार अली इराणीची हत्या केली होती. या घटनेत पोलिसांनी चिकन दुकानदारासह सहा जणांना अटक केली आहे.