महाराष्ट्र

maharashtra

'मुंबईकरांनो जीवनशैलीत बदल करून कोरोनासोबत जगायला शिका'

By

Published : Sep 12, 2020, 2:02 PM IST

मुंबई शहरासह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शर्थिचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दैनदिन व्यवहार सुरू ठेवत असताना नागरिकांना आता स्वत:ची काळजी घेऊन कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार आहे, असे आवाहन मुंबई महानगर पालिका आयुक्त चहल यांनी केले आहे.

commissioner iqbal singh chahal
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मुंबई - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईलाही या विषाणूने हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावर विषाणूवर लस येईपर्यंत नागरिकांना आपल्या जीवनशैलीत बदल करावे लागणार आहेत. स्वत:सह कुटुंबाची काळजी घेऊन कोरोनासोबत जगायला शिकावे लागणार आहे. त्यासाठी येत्या 15 सप्टेंबर पासून मुंबईत 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

कोरोना साथीवर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांनी जीवनशैलीमध्‍ये बदल करणे आवश्‍यक झाले आहे. मास्‍कचा उपयोग, सुरक्षित वावर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्‍यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्‍यात नवीन बदलांचा अवलंब करावा लागणार आहे. या बदलासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राज्यात राबवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मुंबईतही हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या मोहिमेंतर्गत पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक पालिका क्षेत्रातील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांची ताप आणि प्राणवायू पातळी तपासणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचार करणे या बाबी राबविल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचार करणे या बाबींचाही या मोहिमेत समावेश आहे. या मोहिमेत दोनवेळा स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. कुटुंब म्‍हणून आवश्‍यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्‍यांनी घ्‍यावी, कोरोनापासून बचावासाठी आवश्‍यक असलेली पथ्‍ये पाळताना चूक होत असल्‍यास ती एकमेकांच्‍या निदर्शनास आणून द्यावीत, हा यातील महत्त्वाचा भाग असणार आहे.

हे नियम पाळा -
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविता यावा म्हणून पालिकेने मुंबईकरांसाठी नवीन नियमावली बनवली आहे. त्यानुसार नागरिकांनी आपापसात किमान २ मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे. मास्कचा कटाक्षाने नियमितपणे योग्य वापर करावा. वारंवार हात स्‍वच्‍छ धुवावेत. सॅनिटायजरचा योग्‍य वापर करावा. रोज सकाळी शरीराचे तापमान व प्राणवायू पातळी मोजावे. मास्‍क चेहऱ्यावरून काढून ठेवू नये, नाकाखाली चेहऱ्याखाली मास्‍क ठेवू नये. कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेहऱ्यांकडे थेट बघू नये. जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत. जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे. जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्त्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्‍त पदार्थ असावेत असे आवाहन पालिकेने केले आहे.

सोसायटी वसाहतीतही काळजी घ्या-

सोसायटीतील लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. सोसायटी, वसाहतीमध्‍ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. सोसायटींमधील प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करू नये. सोसायटीत दरवाज्‍याचा कडीकोयंडा, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा ठिकाणी कुठेही हात लावणे शक्‍यतो टाळावे. लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपट्यांचा उपयोग करावा. ते कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कचऱ्याच्‍या डब्‍यात टाकावेत या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details