महाराष्ट्र

maharashtra

Tauktae Cyclone : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, राज्यात एकूण 12 जणांचा मृत्यू

By

Published : May 18, 2021, 8:07 PM IST

Updated : May 18, 2021, 10:19 PM IST

मुंबईला जोरदार तडाखा देणाऱया तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव आता ओसरल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. राज्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

mumbai
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान

मुंबई - मुंबईला जोरदार तडाखा देणाऱया तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव आता ओसरल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या वादळाचा शहर व उपनगराचा जोरदार फटका बसला. ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शहर आणि उपनगरांत तब्बल २३६४ झाडे उन्मळून पडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर बोटींच्याअपघातात दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. मागील २४ तासांत कमाल २३० मिमी पावसाची नोंद झाली. आजवर मुंबईत मे महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. राज्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात ४, रत्नागिरीत २, ठाण्यात २, सिंधुदुर्ग 2 तर मुंबई आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे

वादळाचा तडाखा -

प्रतिनिधी अजयकुमार जाधव यांनी घेतलेला आढावा

मुंबईत २४ तासांत सांताक्रुझ येथे २३०. ०३ मिमी तर कुलाबा येथे २०७.६ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने नोंदवली आहे. तर वाऱयाचा ताशी ११४ किमी वेग होता. या वादळासह पावसाने रुद्रावतार धारण करीत दिलेल्या जोरदार तडाख्याने मुंबईकरांना अक्षरक्षः धडकी भरली. मंगळवारीही जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाने इशारा दिला होता. मात्र पश्चिम उपनगरांत सकाळी काही वेळ सरी कोसळल्या त्यानंतर काहीशी वाऱयाची झुळूक वगळता पावसाचा जोर ओसरला. चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्याने मुंबईकरांना हायसे वाटले. सोमवारी झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईत झाडे पडली. भिंतीचे भाग कोसळले. घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. तसेच सखल भागात पाणी साचले होते.

एकूण २३६४ झाडे कोसळली -

चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत एकूण २३६४ झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. यात शहरात ६६६, पूर्व उपनगरांत ५९५ तर पश्चिम उपनगरांत ११०३ असे एकूण २३६४ झाडे पडल्याची नोंद झाली. यात वरळी बीडीडी चाळ येथे वडाचे झाड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

४३ ठिकाणी घराच्य़ा भिंती कोसळल्या -

वादळामुळे सोमवारी पडलेल्या पावसामुळे आणि सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात १८ ठिकाणी, पूर्व उपनगरांत १८ तर पश्चिम उपनगरांत ७ असे एकूण ४३ ठिकाणी घरे व घराच्या भिंती कोसळल्या. या घटनांत ९ जण जखमी झाले.

हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळाचा विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन परीक्षापासून अनेक विद्यार्थ्यां वंचित

बोट अपघातात दोनजण बेपत्ता -

तौत्के चक्रीवादळामुळे मढ जेट्टी येथे अँकर लावलेली बोट फुटून त्यात पाच व्यक्ती अडकली होती. यातील दोन जण बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माहिम कॉजवेच्या मागे, रेती बंदर येथील बोटीचा अँकर तुटून बोट समुद्रात गेली. या बोटीमध्ये पाच व्यक्ती होते. दोन व्यक्ती अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातो आहे.

हेल्पलाईनवर ९८१७ कॉलची नोंद -

तौक्ते चक्रीवादळासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या १९१६ या मदतसेवा दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी विविध तक्रारींसाठी ९८१७ दूरध्वनी केल्याची नोंद झाली.

मच्छिमारांचे मोठे नुकसान -

मुंबईत तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले. ससून डॉक (कुलाबा) बंदरात ५२ मच्छिमार बोटींचे नुकसान झाले. तर माहीम आणि मढ जेट्टी येथे दोन बोटी भरकटून त्यातील दोघे बेपत्ता झाले,तर आठ जणांना वाचविण्यात यश आले. ठाणे जिल्ह्यातील उत्तन गावातील "न्यू हेल्प मेरी" नौका गेल्या तीन दिवसापासून समुद्रात अडकून पडली आहे. त्या बोटीला वाचविण्यात प्रशासनाकडून कसलेच सहकार्य मिळत नाही. आयुक्तांची तक्रार मच्छिमारांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. सदर नौकेवर ६ मच्छिमार अडकले आहेत, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.

हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळामुळे तब्बल 400 ते 500 झाडे पडले उन्मळून; अनेक वाहनांचे नुकसान

नॅशनल पार्कमध्ये शेकडो झाडे भुईसपाट -

तौक्ते चक्रीवादळाने नॅशनल पार्कमधील शेकडो झाडे अक्षरशः भुईसपाट झाली. यामध्ये रस्त्यासह जंगलातील अनेक वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती आरएफओ शैलेश देवरे यांनी दिली. नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेक जुन्या झाडांचाही समावेश आहे. उद्यानाच्या प्रवेश द्वारापासून कान्हेरी गुंफेपर्यंत विविध मार्गावर झाडे पडली. त्यामुळे उद्यान प्रशासनाकडून कोसळलेली झाडे उचलण्याचे आणि स्वच्छतेचे काम वेगाने सुरू आहे.

गेट वे ऑफ इंडिया जवळची भिंत कोसळली -

ऐतिहासिक अशा गेट वे ऑफ इंडिया जवळची सुरक्षा भिंत वादळादरम्यान कोसळली. या भिंतीचे दगड लाटांमुळे बाहेर फेकले गेलेत. याची पाहणी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. या भिंतीची दुरस्ती करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

हेही वाचा -देव तारी त्याला कोण मारी! झाड पडून झालेल्या दुर्घटनेत महिला थोडक्यात बचावली; पाहा व्हिडिओ

Last Updated : May 18, 2021, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details