मुंबई- कामाच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार, गोरगरीब कष्टकरी व्यक्तींना हेरून त्यांच्याशी बोलबच्चन करीत त्यांचे मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना मुलुंड नवघर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.
दोन मिनिटांसाठी कोणाला मोबाईल देत असाल तर सावधान..! - मोबाईल चोरांपासून रहा सावध
राजू विश्वकर्मा असे अट्टल आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह शहानवाज अली या त्याच्या रिक्षाचालक साथीदार आणि जावेद सोळंकी हा चोरलेले मोबाईल विकत घेणाऱ्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राजू विश्वकर्मा असे या अट्टल आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह शहानवाज अली या त्याच्या रिक्षा चालक साथीदार आणि जावेद सोलंकी या चोरलेले मोबाईल विकत घेणाऱ्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एखाद्या गरजू व्यक्तीला काही तासाचे काम आहे, त्यासाठी तुम्हाला हजार, पाचशे रुपये मिळतील, तर येणार का काम करण्यास असे राजू सांगत असे. त्यानंतर आपल्या मोबाईलचा बॅलन्स संपला आहे. जरा घरी फोन करण्यास आपला फोन द्या, तोपर्यंत समोरच्या दुकानात माझ्या गाडीची चावी आहे, ती घेऊन या असे सांगून चावी आणण्यास ती व्यक्ती जाताच राजू शहानवाजच्या रिक्षात बसून पळ काढीत असे आणि हे मोबाईल जावेदकडे आणून विकत असे. अशा प्रकारेच त्यांनी प्रेमलोक बहादूर ठकुल्ला या तरुणाला मुलुंडमध्ये फसवले होते.
त्याला दोन तासाचे काम आहे सांगून, त्याचा मोबाईल फोन लावण्यास घेतला आणि त्याला देखील एक मोटार कार दाखवून समोरच्या दुकानातून त्या गाडीची चावी आणण्यास सांगितले आणि तो दुकानात जाताच त्याचा मोबाईल घेऊन राजू आणि शहानवाजने तिथून पळ काढला होता. मात्र, ही घटना तिथे असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा उपयोग करून या टोळीला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून एकूण ११ मोबाईल आणि गुन्ह्यातील रिक्षा हस्तगत केली आहे.