मुंबई- गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणीं कर्मचाऱ्यांनासाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. मात्र,लोकल प्रवास करण्यासाठी लसवंतांना फक्त मासिक पास देण्यात येत होते. प्रवाशांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळत नव्हते. यामुळे लसवंत प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. मात्र, आता राज्य सरकारने लसवंतांना लोकलचे दैनंदिन तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीत पत्र सुद्धा राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
मुंबईकरांसाठी खूशखबर : आता लसवंतांना मिळणार लोकलचे तिकीट
राज्य सरकारकडून लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आता लसवंतांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठविले पत्र पाठवले आहे.
शंभर टक्के फेऱ्या होणार-
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेवरून 1 हजार 702 आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 304 लोकल फेऱ्या धावत आहेत. असे एकूण 95.70 टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत. तर, आता मध्य रेल्वेवरून 1 हजार 774 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 367 फेऱ्या अशा 100 टक्के फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.