सर्वसामान्यांचा लोकल प्रवास पुन्हा होणार बंद ! गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय होण्याचे संकेत - मुंबईतील लोकल सेवा
राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून लोकलमधील गर्दी हे देखील कोरोना रुग्ण संख्या वाढीचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत लोकल प्रवासावर निर्बंध आलेले नाहीत मात्र येत्या काही दिवसात लवकरच सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
local train service of common people in Mumbai
मुंबई - राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असून लोकलमधील गर्दी हे देखील कोरोना रुग्ण संख्या वाढीचे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे. यावरुन राज्य सरकार पुन्हा लोकांवर निर्बंध घालावे का, याचा विचार करत आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर पुन्हा टांगती तलवार येणार असल्याचे बोलले जात आहे.
वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नुकतेच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लोकल पूर्णपणे बंद करावी किंवा मागच्या वेळेस लोकल सेवेला जे निर्बंध होते ते घालावे, यावर राज्य सरकार विचार करत असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. आतापर्यंत लोकल प्रवासावर निर्बंध आलेले नाहीत मात्र येत्या काही दिवसात लवकरच सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गर्दीवर आतापर्यंत नियंत्रण नाही -
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावले आहेत. यात लोकल सेवा, बस, रिक्षा-टॅक्सी, अन्य प्रवासी सेवा सुरू ठेवल्या आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक सुरळीत आहे. पण गर्दी कमी होत नसल्याने राज्य सरकारपुढे मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर निर्बंध लादण्यासाठी पुढील काळात मोठा निर्णय होण्याचे संकेत शासनाकडून मिळत आहेत.
5 लाख लोकल प्रवाशांची संख्या घटली -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घातलेल्या निर्बंधांमुळे लोकलमधील प्रवाशांची गर्दी थोडी रोडावलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील एका महिन्यात आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील 2 लाख तर पश्चिम रेल्वे मार्गावरील 3 लाख प्रवासी संख्या कमी झालेली आहे. कारण, शासकीय कार्यालयातील विभागांना 50 टक्के उपस्थिती कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर खासगी कार्यालयांना पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झालेली आहे. मात्र तरी सुद्धा पिक अवर्समध्ये लोकल प्रवाशांची गर्दी नियंत्रणात येत नाही.
Last Updated : Apr 9, 2021, 6:55 PM IST