महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Municipal Corporation Elections : मुंबईकरांना मोफत पाणी, घरपट्टी माफ करण्याची 'आप'ची तयारी

दिल्ली आणि पंजाबमधील मोफत वीज आणि पाण्याचे मॉडेल मुंबई महानगरपालिकेत आजमावण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने ( Aam Aadmi Party ) सुरू केला आहे. वीज मोफत देणे शक्य नसले तरी मुंबईकरांना पाणी आणि घरपट्टी तसेच अन्य सुविधा मोफत देता येऊ शकतील, असा दावा आपने केला आहे. मात्र, आपच्या या भूलथापांना मुंबईकर बळी पडणार नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

By

Published : May 30, 2022, 3:42 PM IST

Updated : May 31, 2022, 9:43 PM IST

महापालिका
महापालिका

मुंबई -मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये ( Mumbai Municipal Corporation Elections ) सर्वच राजकीय पक्षांनी आपापली ताकद आणि अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव टाकू न शकलेल्या आम आदमी पार्टीने ( Aam Aadmi Party ) शिवसेना आणि राष्ट्रवादी पेक्षा जास्त मते घेतली हे नक्की. आता सर्वच पक्षांचे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे लक्ष लागले आहे. गेले पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा लागावा यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. आम आदमी पक्षानेही दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत पाणी आणि अन्य नागरी सुविधा मोफत देण्याबाबत विचार सुरू असून तशा पद्धतीचा दावा आपल्या जाहीरनाम्यात करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

मुंबईकरांना मोफत पाणी आणि नागरी सुविधा देणे शक्य - धनंजय शिंदे -मुंबई महानगरपालिकेकडे असलेली ठेव रक्कम आणि महानगरपालिकेचे एकूण बजेट पाहता मुंबईकरांना मोफत पाणी आणि अन्य नागरी सुविधा देणे शक्य आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्येही नागरी सुविधा अत्यल्प दरात किंवा मोफत देण्याचा आम आदमी पक्ष प्रयत्न करणार आहे. त्या दृष्टीने आम्ही अभ्यास करत असून लवकरच त्याबाबत आमच्या जाहीरनाम्यामधून घोषणा करू, अशी प्रतिक्रिया आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे. दिल्ली आणि पंजाब प्रमाणेच आरोग्य शिक्षण पाणी आणि वीज या चार मूलभूत गरजा अत्यल्प दरात किंवा मोफत देण्याचा आम्ही सर्वत्र प्रयत्न करणार आहोत लोकांच्या दैनंदिन गरजा भागवल्या जाव्या यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे जनता त्याला नक्कीच स्वीकारेल, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आपने सारासार विचार करावा, चुनावी जुमलेबाजी नको - आमदार कायंदे -दरम्यान, आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर घोषणा करताना आधी मुंबई महानगरपालिकेचा कार्यप्रणालीचा ढाचा समजून घेतला पाहिजे. मुंबईतील बेस्ट उपक्रम हा महानगरपालिकेच्या अखत्यारित आहे. महानगरपालिका बेस्ट ला मदत करीत असते. बेस्टने यापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास केलेला आहे. तर बेस्टच्या आगे चलो अॅपमुळे तीस लाख प्रवासी संख्या वाढली आहे. सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेत अनेक नवीन आणि चांगले उपक्रम केले आहेत ज्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आणि चुनावी जुमलेबाजी करण्यापेक्षा आप पक्षाने आधी एक तरी नगरसेवक निवडून आणून दाखवावा आणि त्यानंतर महापालिकेच्या कार्यप्रणालीला समजून घेत घोषणाबाजी करावी, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाने मात्र बाळगले मौन -यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे भाजपाचे नेते भालचंद्र शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा आम आदमी पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी काय घोषणा कराव्यात मात्र आपल्याला त्याबद्दल बोलायचे नाही असे म्हणत, याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा -Raj Thackeray : राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना 'होमवर्क'; सर्व मतदारसंघात मनसेच्या सभा, मेळावे

Last Updated : May 31, 2022, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details