महाराष्ट्र

maharashtra

कोरेगाव भीमा प्रकरण : वरावरा राव यांना नानावटीत दाखल करण्याचे निर्देश; जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे

By

Published : Nov 18, 2020, 1:48 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान याबाबत निर्देश दिले. त्यांना राज्य सरकारच्या खर्चाने १५ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच, त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.

Koregaon Bhima case varavara rao
कोरेगाव भीमा प्रकरण : वरावरा राव यांना नानावटीमध्ये दाखल करण्याचे निर्देश; जामीन अर्जावरील सुनावणी ढकलली पुढे

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत आणि तेलुगू लेखक वरावरा राव यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान याबाबत निर्देश दिले. त्यांना राज्य सरकारच्या खर्चाने १५ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच, त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे. न्यायालयात वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतरच वरावरा राव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज द्यावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. वरावरा राव यांच्या जामीन अर्जाला एनआयएकडून विरोध करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ विचारवंत वरावरा राव यांना 2018 मध्ये यूएपीएअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात पुढील उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याला विरोध करण्यात आला होता. कोरोना संक्रमण पाहता वरावरा यांचे वय 81 वर्ष असून, त्यांना इतर आजार असल्यामुळे उपचार करण्यासाठी जामीन देत नानावटी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचे आदेश द्यावेत, याबाबत राव यांच्या कुटुंबीयांकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

जामीन अर्जावरील सुनावणी पुढे..

वरावरा राव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मे महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे जामीनाची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी फेटाळत त्यांच्यावर तळोजा कारागृहातच उपचार सुरू ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ८१ वर्षांच्या वरावरा राव यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, अद्याप त्यांना जामीन देण्यात आला नाही.

रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे कुटुंबीयांना भेटता येणार..

राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देतानाच न्यायालयाने हेही स्पष्ट केले आहे की, वरावरा राव रुग्णालयाच्या नियमांप्रमाणे आपल्या कुटुंबीयांना भेटू शकतील.

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप, चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप..

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेदरम्यान चिथावणीखोर भाषण करत हिंसा घडवून आणल्याचा आरोप वरावरा राव यांच्यासह इतर नऊ जणांवर लावण्यात आलेला आहे. एल्गार परिषदेनंतर कोरेगाव-भीमा याठिकाणी दंगल उसळली होती.

हेही वाचा :मोदींनी बायडेन यांच्या बरोबर साधला संवाद; कोरोना आणि परस्पर सहकार्याबाबत केली चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details