मुंबई -महाविकास आघाडीनेही विरोधकांवर कारवाईचा धडाका लावला. महाविकास आघाडीच्या डझनभर नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मालिक या मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले. याच केंद्र सरकारच्या कारवाईला महाविकास आघाडी सरकार जशास तसे उत्तर देताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे केंद्राच्या कारवाईला उत्तर दिले त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करताना पाहायला मिळते. महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi government ) राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना ( Action against persons speaking state government ) चांगलाच धडा शिकवण्यात येत आहे. राज्य सरकार विरोधात जो कोणी बोलत आहे, अशा सर्व व्यक्तींविरोधात महाराष्ट्रातील विविध जिल्हे किंवा मुंबईतील विविध ( Filing Cases in different parts of state Against opponents ) भागांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई दर्शन घडवण्यात येत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीच्या विरोधात भूमीका घेणा-या नेत्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक होत कारवाई करताना पाहायला मिळते. पण फक्त एकच ठिकाणी कारवाई नाही तर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करून कारवाई होताना पाहायला मिळते आणि मागची प्रकरणे ही काढून त्यात कारवाईचा बडगा सुरु आहे. सध्या सुरु असलेल केतकी चितळे प्रकरण, गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य, प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोणावर कसे गुन्हे दाखल झाले? :
नारायण राणे, केंद्रीय मंत्री :मुख्यमंत्री यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच शरद पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले. एवढच नाही तर राणे यांच्या बंगल्याला अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईची नोटीस पाठविण्यात आली.
ॲड. गुणरत्न सदावर्ते :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर सातारा, कोल्हापूर, आकोट आणि सोलापुरातही विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर अनेक पोलीस स्टेशनने सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी केल्याने 18 दिवस तुरुंगात राहावे लागले. यामध्ये एक वर्षापूर्वीची ही प्रकरणे उकरुन काढून त्यात कारवाई होताना पाहायला मिळाली.
राणा दाम्पत्य :मातोश्री बाहेर हनुमान चालीसा येऊन म्हणणार असल्याचे आव्हान राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिल्यानंतर दोन दिवस मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर राणा दाम्पत्याच्या विरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तब्बल 12 दिवस राणा दाम्पत्याची तुरुंगवारी करण्यात आली. एवढ्यावरच थांबले नाही तर मुंबई महानगरपालिकेला अचानक जाग आली आणि अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाईची नोटीसही पाठवण्यात आली.
अर्णब गोस्वामी :वारंवार मुख्यमंत्र्यांना आव्हान देणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात ही गुन्ह्यांची मालिका सुरु झाली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर टीआरपी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल, वांद्रे येथे गर्दी जमवल्याच्या संबंध थेट मशिदी जोडल्याने गुन्हा दाखल पोलीस दलाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. एवढच नाही तर विधानसभेत शिवसेना आमदारांनी अर्णब यांच्या विरोधात हक्कभंग आणला.