मुंबई -मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा हनुमान चालीसा लावा, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. परंतु, निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. जनता त्याला थारा देणार नाही, अशा शब्दांत सपाचे आमदार अबू आझमी यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर ( MLA Abu Azmi Attack On raj Thackeray ) दिले.
मशिदीपुढे हनुमान चालीसा लावणाऱ्यांचे स्वागत करू - मशिदीवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषणाची तक्रार होत असेल तर गणपती नवरात्री विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का असा सवाल समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू- मुस्लिमांमध्ये भांडण लावून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता त्याला थारा देणार नाही. आम्हाला धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण नको आहे असे आझमी यांनी स्पष्ट केले. तसेच कोणी मशिदीपुढे हनुमान चालीसा लावण्यासाठी येणार असतील तर आम्ही थंड पाणी सरबत देऊन त्यांचे स्वागत करू, असेही आझमी म्हणाले.