मुंबई -राज्यात 'तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त', अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोलले पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोतच, असे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे. आज (सोमवारी) भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमैया यांना ज्या पद्धतीने स्थानबद्ध करण्याबाबत जी घटना घडली, त्या एकूण सगळ्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, अशी मागणी शेलार यांनी सरकारकडे केली आहे.
शेलारांनी उपस्थित केले विविध प्रश्न
कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया हे जात होते. त्यावेळी सोमैया यांना कोल्हापूरला जाण्यापासून पोलीसांकडून रोखण्यात आले. किरीट सोमैया यांनी आधीच सांगितले की, आपण तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घावून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला. नोटीस म्हणून जी दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. इतकी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली असे सांगितले जाते, त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमैयांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.
या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले जाते या बाबत आपल्याला कोणती ही माहिती नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढते. पोलीस ठाण्यात तक्रार करायला जाण्यास रोखणे, त्यासाठी जे कारण दिले तेही संशयास्पद आहे. गुन्हेगार कोण हे माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे माहिती आहे, तो कुठल्या पक्षाचा हेही माहिती आणि मग कारवाई कुणावर आणि अटकाव कुणाला करताय? एकप्रकारे सरकारी यंत्रणेने गुन्हा केला आहे. काही बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात, की मुख्यमंत्र्यांना अवगत केले गेले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी भाजपाच्या वतीने केली आहे.