मुंबई - राज्यात सुरू असलेल्या “ब्रेक द चेन” या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीच्या माध्यमातून मोफत जेवणाची व्यवस्था करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जून २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सादर केलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय १४ मे २०२१ रोजी निर्गमित केला आहे. ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन उद्दीष्ठ (इष्टांकामध्येही) दीडपट वाढ करण्यात आली आहे.
४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क भोजनाचा लाभ -
शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, राज्यभरात ९५० केंद्र - mumbai latest news
शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत देण्यात येणार आहे. याबाबत निर्णय १४ मे २०२१ रोजी निर्गमित केला आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. १५ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
योजनेत आतापर्यंत ४ कोटींहून अधिक थाळ्यांचे वितरण -
योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्रे सुरू आहेत.