महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..त्यांचा वर्षभरापूर्वीच झाला होता पचका, "ते" दु:ख विसरण्यासाठीच भाजप नेते बिहारमध्ये

महाराष्ट्रातही सगळ्यात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल, असे टोलो सामनातून लगावण्यात आलेत.

By

Published : Nov 18, 2020, 9:26 AM IST

Updated : Nov 18, 2020, 10:33 PM IST

Shivsena onBihar election
...त्यांचा पचका वर्षभरापूर्वीच झाला होता, "ते" दुख: विसरण्यासाठीच भाजपनेते बिहारमध्ये

मुंबई-नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार हा भाजपने शब्द दिला होता. हा शब्द भाजपने पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे असे वक्तव्य त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मग फडणवीसांचे महाराष्ट्रातील पंटर पचकले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता. पण त्यांना काय माहित या पंटरांचा पचका वर्षभरापूर्वीच झाला होता. ते दु:ख विसरण्यासाठीच भाजपचे नेते सध्या बिहारमध्ये असतात असा टोला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे ट्वीट केले होते. तोच धागा पकडून फडणवीसांना दिलेल्या शब्दाची आठवण या अग्रलेखातून करून देताना टोले लगावण्यात आले आहेत.

...म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे

बिहारचे सरकार पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही असा दावाही त्यांचा आहे. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे.

शपथग्रहण सोहळ्यात नेहमीची जान आणि उत्साह नव्हता

नितीशकुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, पण यावेळी शपथग्रहण सोहळय़ात नेहमीची जान आणि उत्साह नव्हता. संपूर्ण सोहळय़ावर भारतीय जनता पक्षाचीच छाप होती. बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विजयाचा उत्सव साजरा करीत आहेत ते ‘भाजप’वीर दुसऱ्या क्रमांकावर आणि तेजस्वी यादवांचा ‘राजद’ पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे, पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे.

अपमानिक करून त्यांनाही राजीनामा द्यायला भाग पाडले जाईल

महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुड्या सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळ्य़ांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. नितीशकुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील व एक दिवस ते इतके अपमानित होतील की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल. बिहारात तिसऱया क्रमांकावर घसरलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाचा मुकुट बहाल केला. काय हे औदार्य! राजकारणातल्या या त्यागाचे वर्णन करायला शाई अपुरी पडेल, पण नितीशकुमार या मेहेरबानीच्या ओझ्याखाली किती काळ तग धरतील? की एक दिवस स्वतःच हे ओझे फेकून देतील व नवा रस्ता स्वीकारतील? समोर तेजस्वी यादवांचे आव्हान उभेच ठाकले आहे व विधानसभेत ११० आमदारांची भिंत पार करणे सोपे नाही.

बिहार विजयाचा आनंद पुढील ४ वर्षे साजरा करावा

महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल.

फडणवीसांचे ते ट्वीट

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम! हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे ट्वीट केले होते. तोच धागा पकडून फडणवीसांना दिलेल्या शब्दाची आठवण या अग्रलेखातून करून देताना टोले लगावण्यात आले आहेत.

Last Updated : Nov 18, 2020, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details