महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शेजारील राष्ट्रातील हिंदूना आधार द्या, राजकीय विरोधकांसाठी वापरलेले पेगॅसस अतिरेक्यांविरोधात वापरा - शिवसेना

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक सरपंच व त्यांच्या पत्नीची अतिरेक्यांनी गोळय़ा घालून हत्या केली आहे. अनंतनागमधील घरात घुसून गुलाम रसुल दार व पत्नी जव्हारा बेगम यांना ठार केले. हो दोघेही राष्ट्रवादी मुस्लिम होते व त्यांच्या घरावर तिरंगा फडकत होता. गेल्या काही महिन्यांपासून खोऱयात भाजपसंबंधित लोकांवर हल्ले वाढले आहेत व ही खरोखरच चिंतेची बाब आहे. खोऱयात अतिरेक्यांचा हा असा वावर वाढला असेल तर गुप्तचर यंत्रणा काय करतात? असा सवाल सेनेने केला आहे.

By

Published : Aug 11, 2021, 10:47 AM IST

राजकीय विरोधकांसाठी वापरलेले पेगॅसस अतिरेक्यांविरोधात वापरा - शिवसेना
राजकीय विरोधकांसाठी वापरलेले पेगॅसस अतिरेक्यांविरोधात वापरा - शिवसेना

मुंबई - पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदू यातना भोगीत असतानाच बाजूच्या अफगाणिस्तानातही तालिबान्यांनी हिंदू व शीख समाजावर निर्घृण हल्ले सुरू केले आहेत. मंदिरे, गुरुद्वारात घुसून विध्वंस केला जात आहे. याची फक्त दखल घेऊन किंवा निषेध करूनच भागणार नाही, तर शेजारी राष्ट्रांतील हिंदू-शिखांना आधार वाटेल, असा एखादा दणका देणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी हिंदूंची पिछेहाट व दुर्दशा थांबवावी. ज्याप्रमाणे आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. म्हणूनच शेजार राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलावीत,अशी विनंती शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान हा एक मजबूत देश बनला आहे, असा दावा भाजपातील कडवट मोदीभक्त नेहमीच करीत असतात. त्यात काहीच चुकीचे नाही. मोदी यांच्या 'शक्तिमान' प्रतिमेमुळे तसेच गृहमंत्री शहा यांच्या 'बाहुबली' कार्यपद्धतीमुळे देशातील व देशाबाहेरील अतिरेकी प्रवृत्ती हिंदुस्थानला टरकून असल्याचेही सांगितले जाते, पण गेल्या काही दिवसांत शेजारी राष्ट्रांत तसेच जम्मू-कश्मीर खोऱयात हिंदू आणि शिखांवरील हल्ले वाढले आहेत. त्यांच्याकडे फक्त हिंदू किंवा शीख म्हणून न पाहता आपल्या रक्ताची माणसे म्हणून पाहायला हवे, असे आवाहन शिवसेनेने मोदी आणि शाह यांना केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक सरपंच व त्यांच्या पत्नीची अतिरेक्यांनी गोळय़ा घालून हत्या केली आहे. अनंतनागमधील घरात घुसून गुलाम रसुल दार व पत्नी जव्हारा बेगम यांना ठार केले. हो दोघेही राष्ट्रवादी मुस्लिम होते व त्यांच्या घरावर तिरंगा फडकत होता. गेल्या काही महिन्यांपासून खोऱयात भाजपसंबंधित लोकांवर हल्ले वाढले आहेत व ही खरोखरच चिंतेची बाब आहे. खोऱयात अतिरेक्यांचा हा असा वावर वाढला असेल तर गुप्तचर यंत्रणा काय करतात? असा सवाल सेनेने केला आहे.

पेगॅससचा वापर अतिरेक्यांचा ठावठिकाणी शोधण्यासाठीपण करा-

सरकारने 'पेगॅसस' स्पाय यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केला आहे. त्याऐवजी त्याचा उपयोग अतिरेकी यंत्रणांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केला तर कश्मीर खोऱयातील असंख्य निरपराध्यांचे प्राण वाचतील. 370 कलम हटवूनही खोऱयातले वातावरण शांत झालेले नाही व हजारो कश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे वचन सरकार पूर्ण करू शकलेले नाही. पंडितांना भीती वाटते की, खोऱयातील अतिरेकी त्यांना सुखाने जगू देणार नाहीत, म्हणून अतिरेक्यांच्या मागे 'पेगॅसस' पाळत यंत्रणा लावून पंडितांच्या जिवाचे रक्षण केले पाहिजे,असा टोला शिवसेनेने मोदी शाह सरकारला लगावला आहे.

शेजारी राष्ट्रांतही हिंदू-शीख वगैरे आपल्या भाईबंदांचे जगणे कठीण झाले आहे. पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू समाज अल्पसंख्याक आहे व त्यांचे जगणे म्हणजे नरकयातनाच ठरत आहेत. मंदिरांवर किंवा हिंदूंवर हल्ला झाल्यावर तेथील राजकारणी घटनांचा निषेध करतात. थोडय़ाफार धरपकडीही होत असतात, पण त्यातील किती गुन्हेगारांना कठोर शिक्षा होते? हा प्रश्नच आहे. भितीपोटी येथील हिंदू घरसोडून जात आहेत. मात्र हिंदुस्थानात एक मजबूत हिंदू शासक सत्तेवर असताना शेजारच्याच देशातील हिंदूंचे असे पलायन अस्वस्थ करणारे असल्याची खंतही शिवसेनेने व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातील हिंदूंना सन्मानाने जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. इकडे हिंदुस्थानात आत्मनिर्भर, आत्मसन्मानावर जोर दिला जात असतानाच बाजूच्या राष्ट्रांतील आपले भाईबंद रोज मरणयातना भोगीत दिवस कंठीत आहेत. जे पाकिस्तानात तोच प्रकार बांगलादेशात. बांगलादेशाची स्थापना हिंदुस्थानमुळेच झाली, पण तेथे आज सगळय़ात जास्त खतरा हिंदू समाजास आहे. प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या पंतप्रधानांनी बांगलादेश दौरा केला. दोन देशांच्या मैत्रीचे गोडवे गायले. तेथील हिंदू समाजानेही पंतप्रधान मोदींचे मनापासून स्वागत केले, पण मोदींची पाठ वळताच तेथील मंदिरांवर पुन्हा हल्ले सुरू झाले. पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदू यातना भोगीत असतानाच बाजूच्या अफगाणिस्तानातही तालिबान्यांनी हिंदू व शीख समाजावर निर्घृण हल्ले सुरू केले आहेत. मंदिरे, गुरुद्वारात घुसून विध्वंस केला जात आहे. याची फक्त दखल घेऊन किंवा निषेध करूनच भागणार नाही, तर शेजारी राष्ट्रांतील हिंदू-शिखांना आधार वाटेल असा एखादा दणका देणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details