मुंबई - राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची, तसेच महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टाकण्यात येत असलेल्या धाडी बाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांचा आढावा घेणार
पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तसेच महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार आहे. महाविकास आघाडी सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामांचा आढावा या बैठकीत पवार घेणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुख यांच्यासोबत प्रत्येक महिन्याला एक बैठक घेऊन राज्याच्या विकास कामांचा आढावा घेतात. त्या प्रमाणे आजही ते संपूर्ण राज्याच्या विकासकामांचा आणि राज्यामध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. तसेच, अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.