महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता पालिका अडविणार

26 जुलै 2005 पासून आतापर्यंत मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली 1 हजार 150 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतरही मिठी नदी स्वच्छ झालेली नाही. आजही नदीत सांडपाणी, रासायनिक सांडपाणी बिनधास्त सोडले जात आहे. मात्र, आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविले जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यास पालिकेने दिली आहे.

By

Published : Apr 28, 2022, 9:07 PM IST

महापालिका
महापालिका

मुंबई- 26 जुलै 2005 पासून आतापर्यंत मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली 1 हजार 150 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतरही मिठी नदी स्वच्छ झालेली नाही. आजही नदीत सांडपाणी, रासायनिक सांडपाणी बिनधास्त सोडले जात आहे. मात्र, आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविले जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यास पालिकेने दिली आहे.

सल्लागाराची निवड -आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिठी नदीमध्ये दोन्ही बाजूकडून उत्सर्जीत होणाऱ्या सांडपाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे उप प्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी अनिल गलगली यांना कळविले की, मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सुचविली आहेत. सल्लागाराने सुचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत, गट क्र. 1 अंतर्गत, फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित 8 दश लक्ष घनलिटर इतक्या क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रीया करण्याचे प्रस्तावित केले आहे. हे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून माहे मे, 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सांडपाणी अडवणार -पुढे अशी माहिती दिली की सल्लागाराने सुचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. 2 अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोट्या नाल्यामधून मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे ईत्यादी कामांचा अंतर्भाव आहे. ही कामे प्रगतीपथावर असून डिसेंबर, 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. गट क्र. 3 अंतर्गत भरती प्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत विविध पातमुखांद्वारे उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदी व वाकोला नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे, फ्लड गेट बांधणे, उदंचन पंप बांधणे, प्रामनेड बांधणे इत्यादी कामांचा प्रादूर्भाव आहे. या कामाची निविदा प्रकिया प्रगतीपथावर आहे. गट क्र. 4 अंतर्गत मुख्यतः मरोळ-बापट नाला व सफेद पूल नाला या दोन पातमुखांद्वारे मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते धारावी स्थित सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यंत बोगद्याद्वारे वळविण्याचे काम अंतर्भूत आहे. हे काम प्रगतीपथावर असून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पैशांचे चीज झाले असते -साकीनाका येथील लाठिया रबर रोडवरील रेडिमिक्स कंपनीवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेच्या एल विभाग कार्यकायला कळविण्यात आले आहे. अनिल गलगली यांच्या मते हेच काम सुरुवातीला केले गेले असते तर निश्चितपणे आज खर्च करण्यात आलेल्या पैशांचे चीज झाले असते. आता ही कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा -Mumbai Water Taxi : मुंबईत जल वाहतुकीचे नवे मार्ग सुरु होणार!

ABOUT THE AUTHOR

...view details