मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात राजकीय घडामोडी वेगात सुरू झाल्या. याच कालावधीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली. त्यांची ही भेट तब्बल पाऊण तास चालली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, "काही नाही हो!, दोघे ही आरामात चहा पीत होते. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू झाली, ती त्यांनी पहिली. ती संपल्यानंतर संजय राऊत बाहेर आले आणि तुमच्याशी बोलून निघून गेले".
राऊत आणि पवार यांच्या भेटीची चर्चा केवळ राज्यातच नाहीतर देशस्तरावर सुरू झालेली असताना आव्हाड यांनी मात्र पवार आणि राऊत हे केवळ दोघे चहा पीत बसले होते अशी माहिती देत दोघांच्या भेटीतील गुपित उघड करण्याचे टाळले. दोन्हीही नेते केवळ चहा पित होते असे सहजपणे सांगून आव्हाड यांनी राज्यातील नवीन राजकीय समीकरणे काय ठरलीत याची माहिती देण्यास टाळाटाळ केली.