मुंबई :अन्वय नाईक यांच्या हत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्यानंतर भाजाप नेत्यांनी यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला. भाजप नेत्यांनी विरोध करावा, त्यांना तो अधिकार आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी अन्वय नाईक यांच्या विधवा पत्नी आणि मुलीची भेट घेऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे. त्यांचे निवेदन ऐकूनही भाजप नेत्यांना पाझर फुटला नाही, तर त्यांनी यापुढे देशात मानवता, न्याय आणि सत्य या शब्दांचा वापर करु नये, असे शिवसेना नेते संजय राऊत आज म्हणाले.
रिपब्लिक टीव्ही हा भाजपचा लाऊडस्पीकर..
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामीवरुन भाजपवर टीका केली आहे. अर्णब गोस्वामी भाजपचे कार्यकर्ते आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अमित शाह आणि इतर भाजप नेते विरोधात उतरले असतील. मात्र, अर्णबला पत्रकार म्हणून नव्हे, तर त्याने केलेल्या फसवणुकीसाठी अटक करण्यात आली आहे हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे, असे राऊत म्हणाले. सामना जसे शिवसेनेचे मुखपत्र आहे, त्याप्रमाणेच रिपब्लिक टीव्ही हा भाजपचा लाऊडस्पीकर आहे, असे राऊत म्हणाले.
..तर सर्वांची पळताभुई थोडी होईल
अर्णबला न्यायालयीन कोठडी मिळाली याबाबत मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. उलट, त्याबाबत दिल्लीमधून पडद्यामागे ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या जर मी सांगितल्या, तर सर्वांची पळताभुई थोडी होईल, असे राऊत म्हणाले.