मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारी आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. रेमडेसीवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा, असेही निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणांना आढावा बैठकीत दिले आहेत.
आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पॉझीटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा, जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात याव्यात, अशा सूचनाही आरोग्य मंत्री टोपे यांनी बैठकीत केल्या आहेत.
रेमडेसीवीरचे व्यवस्थापन, वातावरणातून ऑक्सिजन निर्मिती उभारण्यावर भर द्या
हवेतील ऑक्सीजन निर्मिती करा
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य संस्थांमधील कमतरता दूर करा. ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालयांमधील कोवीड सेंटरमध्ये ही प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात यावे. जेणेकरून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रुग्णालये सक्षम होतील, असे आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले. सक्रीय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडेसीवीरचा पुरवठा केला जाणार आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या समवेत आज (गुरुवारी) बैठक झाली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन आणि रेमडीसीवीर पुरवठ्याबाबत नियोजन झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी खाटांचे नियोजन करतानाच या दोन्ही बाबींवर देखील नियंत्रण ठेवावे, असा सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा-कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
होम आयसोलेशन गांभीर्याने घ्या
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज आहे. ज्या जिल्ह्यांचे प्रमाण कमी आहे, त्यांनी ते वाढवावे. त्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीने अन्य विभागातील मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही जिल्ह्यांचा मृत्यूदर वाढत असल्याचे कारण शोधा. रुग्ण उपचारासाठी उशीरा दाखल होत असून त्यांनी वेळेवर दाखल व्हावे, यासाठी जनजागृती करण्यात यावी. जेणेकरून लक्षणे दिसताच रुग्ण वेळेवर रुग्णालयात येतील. त्यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या क्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घ्यावी. लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने चाचणी करतानाच अनावश्यक उपचार न करण्याबाबत सूचना देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पॉझीटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन गांभीर्याने पाळत नाहीत, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांचे संस्थात्मक अलगीकरण करावे, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.
हेही वाचा-रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला मिळणार ऑक्सिजन
रुग्णांची ने- आण करण्यासाठी वाहने घ्या
जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. ॲण्टीजेन चाचण्यांचे प्रमाण कमी करून दोन्ही चाचण्या अनुक्रमे ७०:३० या प्रमाणात करण्यात याव्यात. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट २४ तासात मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक जिल्ह्यात डॅश बोर्ड आणि हेल्पलाईनची सुविधा झाली पाहिजे. कोरोनाबाधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहने भाड्याने घ्यावीत, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्या, असेही टोपे यावेळी म्हणाले.
हेही वाचा-निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनाने निधन
जनजागृती आवश्यक
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना नाकारला जाणार नाही याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी विशेष लक्ष द्यावे. कोविड सेंटर्समधील वातावरण, स्वच्छता, भोजनाचा दर्जा, स्वच्छतागृहांची साफसफाई यासाठी नियंत्रण ठेवावे. आवश्यकता भासल्यास अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. राज्य कृती दलाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार केलेल्या प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिले आहेत. औषधांच्या अतिरेकी वापरावर नियंत्रण ठेवतानाच लक्षणे असेल त्यांना बेड मिळण्यासाठी प्रयत्न करा, असे टोपे म्हणाले.
या आढावा बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, सह आयुक्त डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.