महाराष्ट्र

maharashtra

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी राजभवन उजळणार

By

Published : Nov 13, 2020, 5:52 PM IST

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी राजभवन उजळणार आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले व बांबूपासून तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाश कंदील भेट दिले.

Happy Diwali to the citizens from the Governor
राज्यपालांकडून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई- या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे. स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह आदिवासी महिलांनी तयार केलेले व बांबूपासून तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाशकंदील भेट दिले. तसेच राज्यपालांनी नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपाल जातात, कर्मचारी इथेच राहतात -

“राजभवनात राज्यपाल येत असतात व जात असतात, परंतु येथील स्थायी कर्मचारी मात्र येथेच राहत असतात. त्यामुळे राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची, तसेच चांगली शासकीय सेवा करण्याची जबाबदारी सर्वांची आहे”, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव २०२० LIVE : प्रभू श्रीरामांची शोभायात्रा अयोध्येत दाखल, मुख्यमंत्री योगींनी घेतले रामलल्लाचे दर्शन

आदिवासी बांधवांची उत्पादने -

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपालांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी, अशी सूचना करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.

पालघर जिल्ह्यातील आकाशकंदिल -

त्यानुसार राज्यपालांनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरला आकाश कंदील पुरविण्याचे सूचित केले. केंद्राच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी ही कंदिल तयार करून राजभवन येथे पाठविले व आज राज्यपालांनी आपल्या कर्मचारी व पोलीस जवानांना ते दिवाळीनिमित्त भेट दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदूषणरहित साजरी करावी अशी सूचना राज्यपालांनी केली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव! अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे उजळणार

राज्यातील नागरिकांना शुभेच्छा -

करोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी. दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब व उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतल्यास ही दिवाळी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल. हा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details