महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 28, 2019, 10:19 AM IST

ETV Bharat / city

भाजपचे पृथ्वीराज देशमुखांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होण्याची शक्यता

भाजप-शिवसेना यांचे विधानसभेत बहुमत आहे. त्यामुळे भाजप उमेदवार पृथ्वीराज देशमुखांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पृथ्वीराज देशमुख

मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी भाजप-शिवसेनेच्या वतीने पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात आपले राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी मराठा समाजातील देशमुखांना उमेदवारी देण्याची खेळी भाजपने खेळली आहे.

विधानसभा सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करणार असल्याने आणि भाजप-शिवसेना यांचे विधानसभेत बहुमत असल्याने देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी २८ तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असून काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता धूसर आहे. विरोधकांकडून कुणाचाच अर्ज न आल्यास देशमुख हे बिनविरोध निवडले जातील.

देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांच्याकडे विधानभवनात येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार आशिष शेलार, आमदार अजय चौधरी, आमदार योगेश सागर आणि आमदार सुरेश केळकर उपस्थित होते.

गेल्या वर्षी जुलै २०१८ मध्येही विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेस देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महादेव जानकर यांच्या विजयात अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले होते.

विधानसभेचे गणित

शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत असल्याने पृथ्वीराज देशमुख यांची विधानपरिषद सदस्य म्हणून मुदत २० एप्रिल २०२० पर्यंत राहणार आहे. काँग्रेसचे दिवंगत मंत्री पतंगराव कदम यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून पृथ्वीराज देशमुख यांची ओळख आहे. १९९५ मध्ये कदम यांचा पराभव करुन अपक्ष आमदार म्हणून ते निवडूनही आले होते. २००० साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर, २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख मराठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे चुलतभाऊ संग्राम देशमुख हे सांगली भाजप नेते असून जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details