मुंबई -बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्या घरांवर हल्ला, घरांना आग लावणे लूटमारीच्या अनेक घटना घडत असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प का आहेत?, अशा शब्दात दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, की विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?’ असा सवाल दरेकर यांनी केला आहे. त्याचबरोबर ‘बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम!’ असे ट्विटही दरेकर यांनी केले आहे.