मुंबई- लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढवल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल, असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही, म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला. शासनाने योग्य ते पाऊल उचलले नाही, तर त्याचा उद्रेक देशभर होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉक डाऊनला विरोध केला. लॉक डाऊन वाढवल्याने आपल्यावर उपासमारीची पाळी येईल, अशी भीती या कामगारांना वाटली. त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. या अगोदरही शासनाला आपण विनंती केली होती. शासनाकडे अन्नधान्याचा प्रचंड प्रमाणात साठा आहे. दोन महिन्याचे अन्नधान्य मोफत वाटले असते, तरी चालले असते. परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची सुरुवात वांद्रे येथे झाल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.