मुंबई -मुंबईतल्या गोवंडी परिसरातून गेल्या 11 महिन्यांत 21 तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे बेपत्ता झालेल्या तरुणी जातात कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी गोवंडी पोलीस ठाण्याला भेट देऊन, पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. यावेळी सोमैया यांनी या बेपत्ता मुलींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे.
गोवंडीतून 21 मुली बेपत्ता झाल्या मात्र तपास का झाला नाही?
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गोवंडी परिसरातून २९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या अवघ्या १२ दिवसांत ७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर गेल्या वर्षभरात 21 मुली बेपत्ता झाल्या आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना या मुलींचा शोध घेण्यात यश आले नाही. या बाबत माहिती घेण्यासाठी सोमैया हे आज गोवंडी पोलीस ठाण्यात गेले होते. गोवंडीतून 21 मुली बेपत्ता झाल्या, मात्र त्यांचा शोध का घेण्यात आला नाही असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.