मुंबई -राज्यभरात सध्या मशिद आणि मंदिरावरील भोंग्यांचा विषय तापला आहे. विविध शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील धार्मिद सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्नाच्या आरोपाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जनहित याचिकेवर याचिकाकर्ता हेमंत पाटील यांनी आज तातडीने सुनावणी घेण्यात यावी, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेवून राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका-टिप्पणी करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तसेच मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे चिथावणीखोर वक्तव्य करत मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आदेश ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी, अशी मागणी पाटील मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त तसेच औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. असे असले तरी पोलिसांकडून ठाकरे यांच्याविरोधात जामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.