मुंबई -शरद पवार यांची आठ दशके म्हणजे ही त्यांची तपश्चर्या आहे, त्यांची साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित '८ दशके कृतज्ञतेची' या विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोविड काळात आपण अनेक जिव्हाळ्याची नाती गमावली. त्यामुळे आदरणीय खासदार शरद पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा विचार केला. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब सामान्य कार्यकर्ते तसेच अनेक विभागातील प्रतिष्ठित माणसं यांच्यासाठी वाढदिवस साजरा करावा, असा आग्रह आम्ही ठेवला. शरद पवार यांनी याला होकार दिला आणि हा कार्यक्रम पार पडत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल-
आज देशाच्या राजधानीच्या दारात शेतकरी बसला आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन होत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आदरणीय शरद पवार यांनी ८० वर्षाचा कालखंड अविरत लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. पुढील ५०-१०० वर्षांनी देखील भारतातील सर्व घटकांना मदत करणारा नेता म्हणून पवारसाहेबांचे नाव घेतले जाईल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
झालेले वार अडवण्याचे काम पवारसाहेबांनी केले-
महाराष्ट्र कुणामुळे घडला यात अनेक दिग्गजांची नाव घेता येतील त्यात प्रमुख नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. पण महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्राला आकार देणारे म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले तर चुकीचे ठरणार नाही. २०१९ ला झालेला चमत्कार आपण पाहिला. झालेले वार अडवण्याचे काम पवारसाहेबांनी केले. काही लोक म्हणाले की, पवारसाहेबांचा राजकीय कालखंड समाप्त झाला. परंतु त्यांनी बॉडीगार्ड आणि सरकारी लवाजमा सोडून महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे हे चित्र पुढील काळात नक्कीच बदललेले-
मागच्या निवडणुकीत अनेकांनी पक्ष सोडला. मी सगळ्यांना सांगत होतो आमच्याकडे अ गेला तर ब आहे आणि ब गेला तर क आहे आणि इतकंच नाही तर आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे, हे पूर्णतः खरे ठरले आहे. मी जलसंपदा खात्याची जबाबदारी घेताच शरद पवार यांनी फोन करून नाशिक आणि मराठवाड्यात पाणी देण्याचे काम कसं होईल याची माहिती दे, असा आदेश दिला. या कामाला आम्ही लागलोच आणि आता मी विश्वासाने सांगू शकतो की पुढील ३ वर्षात समुद्रात वाया जाणारे, हे पाणी मराठवाडा भागात फिरवण्याचे काम पूर्ण होईल. त्यासोबतच वैनगंगेच्या खोऱ्यातील पाणी नळगंगेला देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी हा 'पण' करतो की महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे हे चित्र पुढील काळात नक्कीच बदललेले दिसेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला.
व्हर्च्युअल रॅलीमध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोकांचा सहभाग-