मुंबई -विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकरी बंधूंसह एसटीने अगदी दिमाखात पंढरी नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढीवारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.
आषाढी वारी -२०२० : राज्यातील मानाच्या माऊलींच्या पालख्या इतिहासात पहिल्यांदाच एसटीने पंढरीत दाखल.. - पंढरपूर आषाढी वारी
यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंढरीची पायी वारी होऊ शकली नाही. इतिहासात पहिल्यांदाच राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या एसटी बसेसमधून पंढरपूरकडे आज सकाळी मार्गस्थ झाल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास या पालख्या विठूरायाची नगरी पंढरीत दाखल झाल्या.

अशावेळी आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तीर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूरमध्ये आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती. त्यानुसार देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगदेव व संत सोपानदेव, नेवासा येथून संत मुक्ताई, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ, पंढरपुरातून संत नामदेव यांच्या पालख्या एसटीच्या शिवनेरी, शिवशाही, लालपरी अशा विविध बसेसमधून निवडक वारकरी बंधूंसह आज सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या होत्या.
पंढरीच्या मार्गामध्ये अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेने या पालख्यांचे दर्शन घेत फुले वाहिली. मंगळवारी संध्याकाळी या सर्व पालख्या पंढरी नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत. "दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी बंधूंची सेवा करणाऱ्यांचे दायित्व एसटीने अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. यंदा माऊलीच्या मानाच्या पालख्या नेण्याचे भाग्य एसटीला मिळाले, हा एसटीचा बहुमान समजला पाहिजे, असे गौरवोद्गार एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहनमंत्री अनिल परब यांनी काढले आहेत.