मुंबई -२६ जुलै २००५ ला मुंबईत १८ तासात ९९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या जवळपास निम्मा पाऊस काही तासात पडल्याने मायानगरी मुंबईत महापूर आला होता. मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने मुंबई जलमय झाली होती. मुंबईकरांची घरे, दुकाने, वाहने पाण्याखाली गेली होती. मिठी नदी किनारच्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचले होते. मुंबईमधील रस्ते, ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती. ( Mumbai rains of 26 July 2005 ) मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी असल्याने मुंबईकरांनी आहे त्याच ठिकाणी राहणे पसंद केले. जलप्रलया दरम्यान पाण्यात बुडून तब्बल १४९३ जणांचा मृत्यू झाला होता. पावसामुळे मुंबई ठप्प झाल्याने ५०० कोटीं रुपयांचे नुकसान झाले होते. १४ हजार घरांमध्ये पाणी शिरल्याने घरामधील सामानाचे नुकसान झाले होते. पाण्यामुळे ५२ लोकल ट्रेन, ४ हजार टॅक्सी, ३७०० रिक्षा, ९०० बेस्टच्या बसेसचेही नुकसान झाले होते.
या केल्या आहेत उपायोजना - मुंबई समुद्राच्या किनारी आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचते. २६ जुलै २००५ मध्ये ९९४ मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी पडल्याने १४९३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मुंबई ठप्प झाल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ( July 26, 2005, 1493 people died in Mumbai ) अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे, मुंबईमधील पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत सोडण्यासाठी नाल्यांची रुंदी आणि खोली वाढवणे, पावसाचे पाणी अधिक गतीने समुद्रात सोडता यावे म्हणून पम्पिंग स्टेशन उभारणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सुशोभीकरण याचे काम आजही सुरु आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे आदी ठिकाणी पावसाचे पाणी १० ते १५ तासाहून अधिक साचलेले असायचे. गेल्या एकृदोन वर्षात हा कालावधी कमी झाला आहे. या वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतरही दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल आदी ठिकाणी जास्त वेळ पाणी साचलेले नाही.
६ पम्पिंग स्टेशन सुरु - ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैकी हाजीअली, ईला, लव्ह ग्रोव्ह, क्लीव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध या सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहेत. हाजी अली पम्पिंग स्टेशनसाठी १०० कोटी, इर्ला पम्पिंग स्टेशनसाठी ९० कोटी, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनसाठी १०२ कोटी, क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशनसाठी ११६ कोटी, ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनसाठी १२० कोटी, गझदर पंपिंग स्टेशनसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. शहरात साचलेले पाणी पर्जन्य जल वाहिन्यांद्वारे या पम्पिंग स्टेशनमध्ये आणले जाते. त्यानंतर समुद्राला भरती नसताना हे पाणी समुद्रात सोडले जाते. समुद्राला भरती असताना पम्पिंग स्टेशनचे गेट बंद केले जातात. भरती ओसरल्यावर हे पाणी समुद्रात सोडण्याचे काम या पम्पिंग स्टेशनद्वारे केले जाते.
पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या -पावसाळ्यात विशेष करून दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पाणी साचल्यास ते १० ते १५ तासाहून अधिक वेळ साचून राहत होते. पालिकेने मुंबईमधील पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता २५ मिलीमीटर होती ती ५० मिलीमीटर इतकी केली आहे. हिंदमाता परिसरात प्रमोद महाजन गार्डन व झेवीयर्स गार्डन या दोन ठिकाणी मोठ्या भूमीगत टाक्या बनवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये ३ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो. हिंदमाता येथील पावसाचे पाणी या टाकीत साचल्यानंतर पंपाच्या साहाय्याने ते समुद्रात सोडण्यात येत आहे.
परळ येथे दोन रॅम्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा हिंदमाता येथे पावसाचे पाणी जास्त वेळ साचून राहिलेले नाही. मिलन सब वे जवळही अशाच प्रकारच्या भूमिगत टाक्या उभारण्याचे काम सुरु आहे. मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स म्हणजेच पाणी साचणारी ठिकाणे होती. त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पाॅईट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पाॅईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पाॅईट्स पूरमुक्त होतील. फ्लडिंग स्पॉट पूर मुक्त करण्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.
मिठी नदीचे काम आजही अर्धवट - मुंबईतील जलप्रलयाचा अभ्यास करताना, मिठी नदीवरील अनधिकृत बांधकामांमुळे नदीचे पात्र छोटे झाल्याने पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. एमएमआरडीए आणि पालिकेला हे काम देण्यात आले. पुढे एमएमआरडीएने या कामातून बाहेर पडत हे काम महापालिकेच्या माथी मारले. आजही मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.