मुंबई - गेली चाळीस वर्षे आपण राजकारणात आहोत. यापैकी जवळपास 35 वर्षे आपण भारतीय जनता पक्षात काम केले मात्र त्या काळात अनुभवलेली वचनबद्धता अलीकडे दिसत नाही. राजकारण केवळ सूडबुद्धीने सुरू आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना केवळ सूडबुद्धीचे राजकारण करून चालत नाही राजकारणात मैत्री आणि संबंध जपावे लागतात अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadase ) यांनी व्यक्त केली आहे.
राज्यपालांचे वागणे अनाकलनीय -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनाकलनीय रित्या वागत आहेत. गेले दीड वर्ष त्यांनी महाविकास आघाडीची बारा आमदारांची यादी रोखून ठेवली आहे. त्यात त्यांनी योग्य प्रतिनिधी नसल्याचे कारण दिले आहे. आता काही दिवसातच ते नक्कीच 12 आमदार निवडतील. हे बारा आमदार खरोखर योग्य प्रतिनिधी आहेत का? हे आम्ही नक्की पाहू. त्याशिवाय विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रकरणात राज्यपालांनी सांगितले की, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवड करता येणार नाही. मग एका रात्रीत असा काय चमत्कार झाला की त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी दिली, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला आहे.