महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 21, 2022, 1:13 PM IST

ETV Bharat / city

Samruddhi Mahamarg Speed : समृद्धी महामार्ग वेगाचे सर्व रेकॉर्ड तोडणार; 120 किमी प्रतितास राहणार वेग मर्यादा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा 2 मे पासून खुला होणार असून त्यावर वाहनासाठी कमाल वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास ठेवावी, अशी मागणी एमएसआरडीसीने महामार्ग पोलिसांकडे केली आहे.

Nagpur to Mumbai Samruddhi Mahamarg
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

मुंबई - नागपूरकर आणि मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा 2 मे पासून वाहनांसाठी खुला होणार आहे. त्यावर वाहनासाठी कमाल वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास ठेवावी, अशी मागणी एमएसआरडीसीने महामार्ग पोलिसांकडे केली आहे. त्यावर महामार्ग पोलिसांकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग राज्यातील महामार्गावरील सर्व वेगाचे रेकॉर्ड तोडणार आहेत.

राज्यात पहिल्यांदा 120 गतीने गाडी धावणार - देशातील सर्वाधिक मोठा आणि राज्याचा महत्वकांशी असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या संकटामुळे काम मंदावले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळालेली आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा 2 मे पासून खुला होणार असून त्यावर वाहनासाठी कमाल वेगमर्यादा 120 किलोमीटर प्रतितास ठेवावी, अशी मागणी एमएसआरडीसीने महामार्ग पोलिसांकडे केली आहे. त्यावर महामार्ग पोलिसांकडून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची माहिती आहे.

केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशात महामार्गासाठी कमाला वेग मर्यादा ही 120 किमी प्रतितास इतकी निश्चित केली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक वेग मर्यादा ही मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर 100 किमी प्रतिसात इतकी आहे. या उलट महाराष्ट्रातील कुठल्याही राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर 100 पेक्षा जास्त स्पीड नाही. समृद्धी महामार्गावर 120 किमी वेगमर्यादा मिळाली तर, नागपूर ते मुंबई अंतर खऱ्या अर्थाने कमी करण्याचे उद्दिष्ट सफल होणार आहे.

सरळ रस्त्यावर सर्वाधिक अपघात- महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या पाच वर्षात रस्ते अपघाताची संख्या 36 हजाराहून 29 हजारापर्यंत घटली आहे. तर मृत्यू संख्येत मात्र 12 हजाराहून 13 हजारांपर्यंत वाढ झालेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महामार्ग पोलिसांच्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक अपघातांचे मृत्यू हे सरळ रस्त्यावर झालेले आहेत. त्यामुळे वेगमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेताना या सर्व गोष्टींचा विचार महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे.

ताशी 120 वेगमर्यादा पाळणे बंधनकारक - मुंबई ते नागपूर ते अंतर सद्यस्थितीत असलेल्या रस्ता मार्गाने सुमारे 812 किलोमीटर एवढे असून ते पार करण्यासाठी तब्बल 14 तास लागतात. मात्र, समृद्धी महामार्गाने हे अंतर 700 किलोमीटरवर येईल आणि प्रवाशी वाहनांना केवळ 8 तासांतच मुंबईहून नागपूरला पोहोचणे शक्य होईल. प्रवासी वाहतुकीसाठी या महामार्गावर ताशी 120 वेगमर्यादा पाळणे बंधनकारक असेल. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथून मुंबई नागपूरला जाणे केवळ चार तासात शक्य होणार आहे. एकूणच प्रवासी वाहतुकीसाठी हा महामार्ग वरदान ठरेल आणि वेळेची मोठी बचतही होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details