महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पावसाचे पाणी साठवण्यासाठी पालिका बांधणार 'भूमिगत जलबोगदे'

शहरातील मुसळधार पावसात तुंबणारे पाणी साठवण्यासाठी पालिका प्रशासन भूमिगत जलबोगदे बांधण्याच्या विचारात आहे. हे साठलेले पाणी नंतर समुद्रात सोडले जाणार असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे ऐन पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

By

Published : Sep 17, 2019, 5:03 AM IST

जपानच्या कंपनीने महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सविस्तर सादरीकरण केले आहे.

मुंबई -शहरातील मुसळधार पावसात तुंबणारे पाणी साठवण्यासाठी पालिका प्रशासन भूमिगत जलबोगदे बांधण्याच्या विचारात आहे. हे साठलेले पाणी नंतर समुद्रात सोडले जाणार असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे ऐन पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. टोकियो शहरात राबवण्यात आलेल्या धर्तीवर या प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. या उपक्रमाबाबत जपानच्या कंपनीने महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना सविस्तर सादरीकरण केले आहे.

जपानच्या कंपनीने महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सविस्तर सादरीकरण केले आहे.

मुसळधार पावसामुळे सखल भागात साचणाऱ्या पाण्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. दरवर्षीच्या पावसात ही परिस्थिती उद्वभवत असल्याने मुंबईकरांचे हाल होत आसतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने जलबोगद्यांची उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टोकियो शहरात राबवण्यात येणारा ‘भूमिगत जलबोगदा’ हा उपक्रम शहरात राबवण्यासंबंधी विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासंबंधी कामाचा अनुभव असलेल्या जपानी कंपनीच्या अधिकारी-तज्ज्ञांनी प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये भूमिगत जलबोगद्यातील पाणी समुद्रात सोडण्याच्या पर्यायासोबतच या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येऊ शकतो का, या संदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

यावेळी अतिवृष्टीच्या काळात जगभरात राबवल्या जाणार्‍या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. जपानमधील टोकियो शहर जलबोगदा प्रकल्पामुळे पूरमुक्त झाले आहे. यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प मुंबईतही राबवण्याबाबत विचार सुरू असल्याचे पालिकेने म्हटले. या सादरीकरणाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त कुकुनूर, पर्जन्य व जलवाहिन्या खात्याचे मुख्य अभियंता संजय दराडे, जपानमधील संबंधित संस्थेचे महाव्यवस्थापक योशिताका तोयोसू तसेच तंत्रज्ञान व्यवस्थापक ताकेशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जपानचे तज्ज्ञ करणार नदी, तलावांचा अभ्यास दौरा
भूमिगत जलबोगदा उपक्रमासाठी जपानच्या पॅसिफिक कन्सल्टंट कंपनीचे तज्ज्ञ अभ्यास दौरा करणार आहेत. मंगळवारी(दि.17सप्टेंबर)ला पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांसोबत पवई, विहार, तुळशी तलाव व मिठी नदीचा अभ्यास दौरा करण्यात येणार असून, आहे. त्यासंबंधी अहवाल पालिकेला सादर केला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details