महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 8, 2021, 3:06 AM IST

ETV Bharat / city

पाणी पुरवठ्यात मुंबई देशात सर्वोत्तम, महापालिकेचा 'जल निर्मलता' पुरस्काराने गौरव

सन २०१९- २० या वर्षाकरता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला जल निर्मलता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. उपायुक्त अजय राठोरे यांनी हा पुरस्कार हैदराबाद येथे नुकत्याच एका विशेष कार्यक्रमात स्वीकारला.

पाणी पुरवठ्यात मुंबई देशात सर्वोत्तम
पाणी पुरवठ्यात मुंबई देशात सर्वोत्तम

मुंबई -सन २०१९- २० या वर्षाकरता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला जल निर्मलता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. उपायुक्त अजय राठोरे यांनी हा पुरस्कार हैदराबाद येथे नुकत्याच एका विशेष कार्यक्रमात स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात जल विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रातील पाणीपुरवठयात बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुधारणा केल्या असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

पाण्याच्या दर्जाबाबत पुरस्कार

भारतातील नामांकित अशा 'इंडियन वॉटर वर्क्स' असोसिएशनतर्फे दरवर्षी "जल निर्मलता" पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विशेषतः नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा क्षेत्रातील तंत्रज्ञान, कुशल प्रशासन आणि उच्च प्रतिच्या व्यवस्थापनातून पाण्याचा दर्जा सुधारून पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात येतो. पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्राहक व्यवहार मंत्रालय , यांच्यातर्फे देशातील २१ शहरामध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून, पाण्याच्या विविध ४७ मानकांकरिता तपासण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागातील वरळी, करी रोड, शिवडी, पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली, जोगेश्वरी तसेच पूर्व उपनगरातील पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्यातील सर्व नमुने ४७ मानकांकरीता योग्य आढळले असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

महापालिकेतर्फे दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. त्यातून सेवा जलाशय व जलवितरण व्यवस्थेत निवडक ३५८ ठिकाणे पालिकेच्या जल विभागाने पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी निश्चित केलेली आहेत. त्यापैकी आरोग्य खाते व गुणनियंत्रण (जलकामे) विभागाकडून दैनंदिनी ११० ते १३० ठिकाणाहून पाण्याचे नमुने गोळा करून आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील प्रयोगशाळेत 'मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक' या अद्यावत व अचूक तंत्रज्ञानाने डब्ल्यू, एच. ओ मानांकनानुसार तपासले जातात. दादर येथील प्रयोगशाळेला डिसेंबर २०२० मध्ये नॅशनल बोर्ड ऑफ लेबोरेटरीजचे नामांकन प्राप्त झाले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुध्द

मुंबईतील १ लाख ७५ हजार ठिकाणच्या गळती शोधून दुरूस्ती करण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजार ९०८ सेवा जोडण्या बदलण्यात आल्या. सन २०१२ ते २०१८ पर्यंत विविध जलद बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले. जल अभियंता विभागातर्फे मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या अशा विविध उपाययोजनांमुळे सन २०१९-२० या कालावधीत पाण्याच्या दर्जात्मक आणि शुद्धतेत ९९.३४ टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details