मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाटयाने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, यासाठी पोलीस दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता रस्त्यांवर उभे आहेत. काही पोलीस संक्रमितही झाले आहेत. मात्र, मुंबईत एका वाहतूक विभागातील पोलीस हवालदारास आजारी असल्याने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्यास चक्क नकार दिल्याने पोलीस दलात नाराजी पसरली असून शेवटी वरिष्ठांच्या मध्यस्तीने त्यास मंगळवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याला पालिकेच्या 4 रुग्णालयाने दाखल करून घेण्यास दिला नकार..! - कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलिस हवालदारास
मुंबईत एका वाहतूक विभागातील पोलीस हवालदारास आजारी असल्याने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्यास चक्क नकार दिल्याने पोलीस दलात नाराजी पसरली असून शेवटी वरिष्ठांच्या मध्यस्तीने त्यास मंगळवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबईतील कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलीस हवालदारास सोमवारी ताप आल्यामुळे त्यांनी स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. प्रकृतीत फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे ते मुलालासोबत घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जाण्याची सूचना केली. त्यानुसार ते दोघे नायर रुग्णालयात गेले त्याठिकाणीही बेड शिल्लक नसल्याचे डॉक्टरांनी कारण सांगितले व त्यांना पुढे केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. आजारी पोलीस व मुलगा केईएम रुग्णालयात पोहचले. तोपर्यंत रात्रीचे 9 वाजले तरी 4 रुग्णालय फिरूनही दाखल करून घेत नसल्याने मुलगा हताश झाला. आता तरी वडिलांना उपचार मिळतील, असे त्यास आशा होती. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासलेही नाही आणि जागा नसल्यामुळे पुन्हा कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले.
हवालदिल झालेल्या पोलिसांनी अखेर ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वरिष्ठांनी भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. भोईवाडा पोलिसांनी रुग्णालय प्रशासनास विनंती केल्यानंतर या आजारी पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 20 मध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना संकटात जर आजारी पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी जर अशी वेळ येत असेल तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल याचा विचार न केलेला बरा.