महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी : काँग्रेस - modi government fails to protect country borders

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात अनेक काँग्रेस सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

congress vs bjp
काँग्रेस विरुद्ध भाजप

By

Published : Jun 26, 2020, 7:24 PM IST

मुंबई - भारताचा शेजारी देश चीन, हा सीमेवर सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले आहे. तसेच सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे, असा आरोप करत सरकारला याचा जाब विचारण्यासाठी तसेच २० हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने आज (शुक्रवार) राज्यव्यापी आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

सध्या भारत-चीन सीमेवर जे घडत आहे त्यातून आपले परराष्ट्रीय धोरण चुकलेले दिसते. आजपर्यंत चीनला आपण रोखले होते. मात्र, आज ती स्थिती राहिली नसून सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार कमी पडले, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

हेही वाचा...पुन्हा लाॅकडाऊन अशक्य आणि पाहिजे असेल तर मोदींना सांगा : भुजबळ

बाळासाहेब थोरात यांनी आज (शुक्रवार) सकाळी मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सहकाऱ्यांसह शांततेत आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. राज्यव्यापी आंदोलनाबरोबरच #SpeakUpForOurJawans ही ऑनलाइन मोहिमही राबिवण्यात आली. यावेळी थोरात यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, आमदार झिशान सिद्दीकी, चरणजितसिंग सप्रा, मधु चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत हे उपस्थित होते.

दुपारी गांधी भवन येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत केले. यावेळी चव्हाण यांनी चीनच्या घुसखोरीवरुन मोदी सरकारचा खरपूर समाचार घेतला. चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे. देशहिताचा विचार करत सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु, चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही, हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे, असे चव्हाण म्हणाले.

हेही वाचा...व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

चीनने मोदींच्या वक्तव्याचा पुरेपुर फायदा उठवत घुसखोरी केली नाही, असे तो जगभर सांगत सुटला आहे. पंतप्रधानांचे हे वक्तव्य काँग्रेसला मान्य नाही. पंतप्रधान कार्यालयाने त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते पुरेसे नसून सरकारने पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानावर खुलासा करावा. एवढ्या मोठ्या आणि अत्यंत गंभीर प्रश्नावर बोलताना पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने बोलणे अपेक्षित आहे, पण तसे झाले नाही. सरकारला प्रश्न विचारणे विरोधकांचे काम आहे आणि त्याला उत्तर देणे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे, असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग हे सहा वर्षात १९ वेळा भेटले. त्याचा भारताला काहीच फायदा झालेला नाही. यावेळी चव्हाण यांनी मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. एप्रिल, मे २०२० मध्ये चीनने भारताच्या हद्दीत कितीवेळा आक्रमण केले? पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत ‘ते’ वादग्रस्त विधान का केले ? पंतप्रधानांच्या विधानामुळे वाटाघाटीत भारताची भूमिका कमकुवत पडली का? सीमेवरील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारत सरकारने काय उपाय केले? या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने द्यावीत, असे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

हेही वाचा...कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना सरकारी निवासस्थानात राहण्याची मुभा - गृहमंत्री

चीनने सीमा भागातील आपल्या कुरापती थांबवलेल्या नाहीत. सॅटेलाईटच्या माध्यमातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या असून गलवान भागातून चीन परत गेलेला नाही. उलट त्या भागात चीनी सैन्यांच्या चौक्या आहेत, लष्करी वाहनांची ये जा सुरु आहे. जवळपास १० हजार सैनिक त्या भागात तैनात आहेत, मोठा तोफगोळाही आहे. चीनकडून गलवान नदीपात्रात बांधकामही सुरु आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details