मुंबई - बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले असताना बॉलिवूड मुंबईतच राहणार, आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटले आहे.
आशियातील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधने असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवल्याचे योगी म्हणालेत. ती काय पर्स आहे का? कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. मुंबई फिल्मसिटी आपले काम करेल. यूपीतील नवी फिल्मसिटी त्यांचे काम करेल, असेही योगी यावेळी म्हणालेत.
आपल्या दुसऱ्या मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी आज उद्योजक-बँकर्स सोबत चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचं आवाहन केल्याचं म्हटलं. आज योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डाॅ.निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल. अॅण्ड टी चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नाॅलाॅजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकाॅम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी इ. उद्योजकांना भेटले व चर्चा केली. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही भेट घेतली. उद्योजकांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिलाय, असे आदित्य योगीनाथ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
भारताची इकॉनॉमी वाढावी हे लक्ष ,कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही
बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचे काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असे सांगत योगीना शिवसेनेला चिमटा काढला. भारताची इकॉनॉमी वाढावी हे लक्ष कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी वाढवायची आहे. मला वाटते हेच सर्वांचंही लक्ष असले असे योगी यांनी म्हटले .
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून योगी आदित्यनाथ यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. आज योगी आल्यांनातर एका छोटेखानी सोहळ्यात लखनऊ महापालिके(LMC)च्या पहिल्यावहिल्या बाँडचं आज अनावरण बीएसई येथे केले . लखनऊ महापालिकेने शहराचं सौंदर्यीकरण, विकास आणि स्वच्छता इ. कामांना गती देण्यासाठी २०० कोटी रुपयांचा बाँड जारी केला आहे. या बाँडला गुंतवणूकदारांची जबरदस्त प्रतिसाद दिल्याने हा बाँड ४.५ पट अधिक (४५० कोटी रुपये) सब्स्क्राईब झाला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार गाजिायाबाद, वाराणसी, आगरा आणि कानपूर इ. शहरांसाठी देखील बाँड लवकरच काढू असे देखील योगी यांनी म्हटले.
शिवसेनेकडून जोरदार टीका
''मुंबईतील फिल्मसिटी तुम्हाला हलवता येणार नाही, असे सांगत नोएडा येथे उभारलेल्या फिल्मसिटीचे काय झाले याची विचारणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. योगीजी हैदराबाद, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बंगळुरू येथे ही फिल्म इंडस्ट्री आहे. तिथेही ते जातील का? की फक्त मुंबईशीच योगी पंगा घेत आहेत? असा खोचक सवाल ही त्यांनी उपस्थित केला. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा. तुम्ही भिंती उभ्या कराल. पण चित्रपटसृष्टी निर्माण करणार का?'', असा प्रश्नदेखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बेरोजगारी लपवण्यासाठी व उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग
मनसेने लावलेल्या बॅनरवर म्हटले आहे की, ''कहा राजा भोज ... और कहा गंगू तेली... " कुठे महाराष्ट्राचं वैभव... तर कुठे युपीचं दारिद्र्य ... " भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचे मुंगेरीलालचं स्वप्नं." अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला 'ठग' असे चुक्कल यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने योगी यांच्या दौऱ्यावर साधला होता निशाणा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. बॉलिवूड निर्मात्यांसोबत तसेच राज्यातील उद्योजकांसोबत चर्चा करणार आहेत. एकंदरीत उत्तर प्रदेशात आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आमचा त्यांना सल्ला आहे की, उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. या विषयाकडेदेखील त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे सचिन सावंत म्हणाले आहेत. यावेळी, योगी यांच्या भेटीनंतर बॉलिवूडधील निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती केली जाऊ शकते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री मोहसिन रझा यांचा मोठा आरोप
उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री मोहसीन रझा यांनी महाराष्ट्र सरकारवर मोठा हल्ला केला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे सरकार अंडरवर्ल्डच्या दबावाखाली काम करत आहे. मंत्री मोहसिन रझा यांनी मोठा आरोप केला की, चित्रपटसृष्टीतील सर्व अभिनेते, अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यावर विविध वक्तव्यांद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'तिथले सरकार अंडरवर्ल्ड चालवित आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था असे काही नाही. अशा परिस्थितीत कोणालाही तिथे रहायचे नाही. म्हणून आता लोक उत्तर प्रदेशकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. अयोध्या, काशी, मथुरा, वृंदावन यासारख्या सांस्कृतिक वारशासुद्धा येथे चांगल्या कायदा व सुव्यवस्थेसह उपस्थित आहेत,' असे मोहसीन रझा म्हणाले.
अक्षय कुमार आणि कैलास खेर यांची घेतली भेट
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत मंगळवारी चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली. 'भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. सिनेविश्वाच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली', असे योगींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. शिवाय त्यांनी गायक कैलास खेर यांच्या बरोबरही चर्चा केली आहे.