मुंबई - शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या बाबतीतला निर्णय घेतला, परंतु उपनगरातील मोडकळीस आलेल्या भाडेकरू इमारतींचे काय? असा प्रश्न आज भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. यासाठी कायदा त्वरित आणावा व मुंबई उपनगरातील विकासाचे दार त्वरित उघडावे, अशी विनंती पत्र लिहीत केली आहे.
मुंबईच्या उपनगरात सुद्धा मोडकळीस आलेल्या व पुनर्विकासाची गरज असलेल्या हजारो इमारती आहेत, यातील हजारो रहिवाशांना पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकांनी रस्त्यावर आणले आहे. तसेच मोडकळीस आल्या म्हणून भाडेकरूंना बेघर करण्याचे मोठे षडयंत्र विकासक करत आहेत. पण त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्नही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
पुढे पत्रात म्हटले आहे की, उपकरप्राप्त इमारती या फक्त मुंबई शहरातील आहेत, उपनगरातील भाडेकरू इमारतींच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये एक धोरण आखले होते व ते विधी खात्याकडे प्रलंबित आहे, त्यावर सुद्धा तत्काळ निर्णय करण्याची आवश्यकता आहे.