मुंबई -राज्यातील सर्वच घटकांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प (MH Budget 2022) मांडला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे, असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी वर्गाकडे विशेष लक्ष दिले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदानाची घोषणा केली आहे. याचा फायदा राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
कोविड सारख्या महामारीवर मात करून राज्याच अर्थचक्र रुळावर आणत महाविकास आघाडी विकासाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महापुरुषांशी संबंधित १० शाळांचा विकास करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे खानवडी पुणे, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले नायगाव खंडाळा, शाहु महाराज यांचे जन्मस्थान कागल,अन्नाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, येथील शाळांचा विकास राज्यसरकार करणार असल्याची बाब देखील कौतुकास्पद आहे. जगाची अर्थ व्यवस्था कोलमडली पण आपल्या राज्यात मात्र कोणत्याही गोष्टीची कमी महाविकास आघाडी सरकारने जाणवू दिली नाही. याउलट या दोन वर्षांच्या कालावधीत राज्याने प्रगतीच केली आहे असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा कालच १२५ वा स्मृतिदिन साजरा झाला. फुले दांपत्याने समाजासाठी घेतलेले अविरत कष्ट आणि त्यांचे कार्य समाजात पोहचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने फुले दांपत्याचे निवासस्थान असलेले "फुलेवाडा" या राज्य संरक्षित स्मारकासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत त्यांच्या कोल्हापूर येथील स्मारकाला योग्य तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याच प्रमाणे महाराणी सईबाई आणि संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिस्थळाचा विकास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड किल्ला व परिसर विकासाकरिता सन २०२२-२३ मध्ये १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ६ किल्ल्याना देखील भरघोस निधी देणार असल्याची बाब गौरवास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.