महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 25, 2020, 12:34 PM IST

ETV Bharat / city

धक्कादायक! एनओसी घेऊनही पुनर्विकासाचे रखडले काम; 464 बिल्डरांना म्हाडा बजाविणार नोटीस

मुंबईत आजच्या घडीला 16 हजार जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मात्र या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण नसल्याने या इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. मिश्रा मेंशन दुर्घटनेनंतर दुरुस्ती मंडळाने चालू पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. या आढाव्यानुसार एकूण 1 हजार 336 प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. यातील 183 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

संग्रहित
संग्रहित

मुंबई - दक्षिण मुंबईतील इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर मुंबईतील 16 हजार धोकादायक उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला. म्हाडाने 1336 प्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देऊनही 464 एनओसीधारक बिल्डरांनी पाच वर्षे पुनर्विकासाची वीट रचलेली नाही. या बिल्डरांना म्हाडाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.

बिल्डरांनी पुनर्विकासाचे प्रकल्प रखडविल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. म्हाडाने अशा बिल्डरांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. या 464 बिल्डरांना पुनर्विकास नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहेत. तर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर एनओसी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

पुनर्विकासाचे धोरण नसल्याने समस्या-
मुंबईत आजच्या घडीला 16 हजार जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मात्र या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण नसल्याने या इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. लाखो लोक जीव मुठीत धरून आजही जगत आहेत. यातील काही इमारती पावसाळ्यात कोसळतात. त्यात काहींचा जीव जातो. त्यानंतर या इमारतीच्या पुनर्विकासावर चर्चा होते. त्यानंतर काही दिवसांनी हा विषय मागे जातो. त्यात एकीकडे सरकारी धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला आहे. तर दुसरीकडे सुमारे दीड हजार इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्यातील कामाकडे दुरुस्ती मंडळाचे म्हणावे तसे लक्ष नसल्याचे चित्र असल्याची धक्कादायक बाब मिश्रा मेंशन इमारत दुर्घटनेतून समोर आली. कारण या इमारतीसाठी एनओसी देऊन बराच काळ लोटला तरी बिल्डरने काम सुरू केले नव्हते. त्याच्या या चुकीची शिक्षा रहिवाशांना भोगावी लागली आहे.

अशी आहे इमारतींच्या पुनर्विकासाची स्थिती-
मिश्रा मेंशन दुर्घटनेनंतर दुरुस्ती मंडळाने चालू पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. या आढाव्यानुसार एकूण 1 हजार 336 प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. यातील 183 प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. तर 568 प्रकल्पांचे काम सुरू आहे. तर 98 प्रकल्पात काम सुरू होऊन रखडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 464 बिल्डरांनी एनओसी घेऊनही काम सुरूच केलेले नाही. यातील काही जणांना एनओसी देऊन पाच वर्षे उलटली आहेत. त्यामुळे काम सुरू न करणाऱ्या या 464 बिल्डरांना दुरुस्ती मंडळाकडून दणका दिला जाणार आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे.

काम रखडविणाऱ्या 98 बिल्डरांनाही दणका?
अर्धवट काम करणाऱ्या 98 बिल्डरांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले आहे. समाधानकारक उत्तर दिले नाही, तर त्यांच्याही एनओसी रद्द करत प्रकल्प त्यांच्याकडून काम काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

म्हाडाकडून 24 बिल्डरांना दणका, एनओसी रद्द
उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी एनओसी दिल्यानंतर नियमानुसार ठरविक कालमर्यादेत काम सुरू करणे बंधनकारक आहे. तर काम वेळेत पूर्ण करणेही बंधनकारक आहे. पण या नियमांचे उल्लंघन अनेक बिल्डर करताना दिसतात. तर काही बिल्डरांना विविध अडचणीमुळे काम सुरू करता येत नाही. अशा एकूण 24 प्रकल्पांच्या एनओसी रद्द करण्यात आल्या आहेत.



ABOUT THE AUTHOR

...view details