महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 30, 2021, 8:01 PM IST

ETV Bharat / city

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आघाडी सरकारच्या बैठका, तर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची तयारी

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र ही निवडणूक घेण्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले होते.

election-of-the-speaker-of-the-assembly
election-of-the-speaker-of-the-assembly

मुंबई - विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र ही निवडणूक घेण्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले होते. मंगळवारी (29 जून रोजी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठक पार पडली होती. या बैठकीतही विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. तर तिथेच काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या घरी बोलावण्यात आली होती.

राजकीय विश्लेषक

या बैठकीतही विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा झाली होती. साधारणत: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याचा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. मात्र सध्या राज्यातील राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडी सरकारला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून देखील विधानसभा अध्यक्षपदासाठी नेत्यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, असे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे !

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात 5 जुलैला महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. तर तिथेच सहा तारखेला अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर तिथेच महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना महाविकास आघाडी सरकारचा बहुमताचा आकडा होता, त्यापेक्षाही अधिक मताने महाविकास आघाडी सरकारचा उमेदवार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून येईल असा विश्वास अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
निवडणुकीबाबत आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये भीती?
गुप्त मतदान पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असते. या प्रक्रियेमुळे महाविकास आघाडी सरकार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भीत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आला आहे. दोन दिवसीय अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी उपस्थित राहावे म्हणून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही त्या पक्षाच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. व्हीप बजावल्याने प्रत्येक आमदाराला उपस्थित राहून मतदान करणे गरजेचे असणार असल्याची माहिती विधी तज्ज्ञ अनंत कळसे यांच्याकडून देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक -
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक उद्या बोलवण्यात आली आहे. या बैठकीला तीनही पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडत असताना महाविकास आघाडी कडून घेण्यात येणाऱ्या सतर्कते बाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तर तिथेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विरोधी पक्षाकडून केवळ संभ्रम पसरवण्याचे काम केले जाते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details