महाराष्ट्र

maharashtra

अँटिलिया प्रकरण : कटात मनसुख हिरेनचा सहभाग, त्यामुळेच त्यानं जीव गमावला; एनआयएची कोर्टात माहिती

By

Published : Apr 8, 2021, 12:20 AM IST

Updated : Apr 8, 2021, 5:10 AM IST

अँटिलिया कार स्फोटकं प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझेच्या कोठडी संदर्भात 7 एप्रिलला मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली.

Mansukh Hiren
मनसुख हिरेन

मुंबई -अँटिलिया कार स्फोटकं प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझेच्या कोठडी संदर्भात 7 एप्रिलला मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली. मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया'बाहेर स्फोटकं ठेवण्याच्या कटात मनसुख हिरेनही सहभागी होता. त्यामुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला, असा दावा एनआयएने बुधवारी विशेष कोर्टात केला. या संपूर्ण प्रकरणात काहीतरी मोठा आर्थिक उद्देश होता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता? याचीही चौकशी होणं आवश्यक असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं.

हेही वाचा -मुंबईकरांना २४ तास घरपोच मागवता येणार पार्सल.. अनेक घटकांना नाईट कर्फ्यूतून सूट

वाझेला 9 एप्रिलपर्यंत कोठडी

प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेला 9 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. युएपीए कायद्यातील तरतूदीनुसार आरोपीची 30 दिवसांची कोठडी पूर्ण करण्याची मागणी एनआयएच्यावतीनं एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला केली. त्यानुसार कोर्टानं वाझेला आणखी दोन दिवसांची एनआयए कोठडी वाढवून दिली आहे. तसेच त्यांना योग्य ती वैद्यकीय सुविधा देत, पुढील सुनावणीत वाझेच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला दिले आहेत. सचिन वाझेसह याप्रकरणात अटकेत असलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या अधिक कोठडीची गरज नसल्याचं तपास यंत्रणेनं कोर्टाला सांगितलं. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे

सचिन वाझेची चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी

सचिन वाझेची चौकशी करण्यास सीबीआयला कोर्टानं परवानगी दिली आहे. सीबीआयनं बुधवारी एनआयए कोर्टात तसा रितसर अर्ज केला होता. तेव्हा आता एनआयए कोठडीतच सीबीआय परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करणार आहे. याबाबतच्या वेळा दोन्ही तपास यंत्रणांनी आपापसात मिळून ठरवाव्यात, असे निर्देशही कोर्टानं दिले आहेत. हाय कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक मुंबईत दाखल झालं आहे. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांनी राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी मुबई पोलिसांना दरमहा 100 कोटींचा हफ्ता वसूल करून देण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा -शिवथाळी : पार्सल देण्याचा आदेश आलेला नाही; महापालिकेतील कॅन्टीन चालकाची माहिती

Last Updated : Apr 8, 2021, 5:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details