महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2019, 9:56 AM IST

ETV Bharat / city

शिवसेनेशी जुळवून घ्या, सरसंघचालकांचा फडणवीसांना सल्ला

या भेटीत मुख्यमंत्र्यांनी उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर भागवत यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत भागवतांनी शिवसेनेसोबतच जुळवून घेण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर मुख्यमंत्री पुन्हा मुंबईला परतले असून राजकीय कोंडी सोडवण्याचा आजच प्रयत्न करणार आहेत.

शिवसेनेशी जुळवून घ्या

मुंबई -'शिवसेनेसोबतच जुळवून घ्या,' असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच, आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी फडणवीसांना हा मोलाचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल मुंबईत भाजप कोअर कमिटीची बैठक आटोपल्यावर तातडीने नागपुरात सरसंघचालक भागवत यांची भेट घेतली होती.

या भेटीत मुख्यमंत्र्यांनी उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर भागवत यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत भागवतांनी शिवसेनेसोबतच जुळवून घेण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर मुख्यमंत्री पुन्हा मुंबईला परतले असून राजकीय कोंडी सोडवण्याचा आजच प्रयत्न करणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली असून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह एक मलाईदार खाते देण्याची मंजुरी दिल्लीतून मिळवली आहे. मात्र, शिवसेना अजूनही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपकडून शिवसेनेने समोर झुकल्याचे चित्र निर्माण होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच अद्याप भाजपचा एकही नेता मातोश्री वर दाखल झाला नाही. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देता कामा नये, अशी भूमिकाही भाजपने घेतली आहे. मात्र कोंडी फोडण्यासाठी राजकीय नेत्यांऐवजी अन्य व्यक्ती कडून मदत घ्यावी, अशा सूचनाही दिल्लीतून करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.

येत्या दोन दिवसात शिवसेनेशी संपर्क करून शिवसेनेला सोबत घेऊनच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी करावा, असे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेला डावलून शपथविधी उरकल्यास दोन्ही पक्षातील संबंध अधिकच चिघळतील, अशी भीतीही भाजपच्या काही नेत्यांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details