मुंबई -राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज ( शुक्रवार ) पार पडले. उपमुख्ममंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. या सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील गोर, गरीब, दीन-दलित, शेतकरी, कामगार, मराठा, ओबीसी, आदिवासी अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली आहे, असा निशाणा फडवीसांनी साधला ( Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi ) आहे.
आमच्या योजना सरकार राबवत आहे
अर्थसंकल्पानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन करणारा पंचसूत्री अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. राज्यात केंद्र सरकारच्या योजना लागू करण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना काहीही न देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. याला कुठलीही दिशा नाही. मागील अर्थसंकल्पातील घोषणा यामध्ये करण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता त्याच योजना राबवत आहे.
शेतकर्यांची घोर निराशा
शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात काही दिले नाही आहे. दोन वर्षापूर्वी ५० हजार मदतीची घोषणा केली ती आता देत आहेत. नैसर्गिक आपत्तीत कोणतीही मदत सरकारने शेतकऱ्यांना दिली नाही. कोरोना काळात जास्त नागरिक महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पेट्रोल - डिझेल करात दिलासा नाही
केवळ काही मतदार संघापुरता आणि फक्त काही नेत्यानं पुरता हा अर्थसंकल्प आहे. देशातल्या 22 राज्यांत पेट्रोल- डिझेल वर कर कमी केला. पण, सरकारने फुटकी कवडी दिलेली नाही. या अर्थसंकल्पात हा कर कमी केला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सरकारने पुन्हा या प्रश्नावर निराशा केली आहे. या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात सायकलवरुन मोर्चा काढला होता. शिवसेना व राष्ट्रवादीचे लोक आता कोणता मोर्चा काढणार, असा प्रश्न विचारत फडणवीसांनी काँग्रेसला टोमणा मारला आहे.
मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेन चा आग्रह का?
बुलेट ट्रेनला विरोध करणारे सरकार आता हैदराबाद बुलेट ट्रेनची मागणी करत आहेत. केसीआर भेटून गेले असल्याने त्यांना हैदराबाद-मुंबई बुलेट ट्रेन हवी असणार, असा टोलाही देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. एसटी कामगारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण नव्याने काही नाही. एसटी आता पंचतत्त्वात विलीन करणार की काय? अशी भीती वाटत आहे, असा टोलाही देवेंद्र फडवणीस यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना लगावला आहे.
पिक विम्यात विमा कंपन्यांचे खिसे भरले गेले
पीक विम्यात भाजपा सरकार असताना सर्व गोष्टी वेळेवर होत होत्या. मात्र, महाविकास आघाडी पंचनामे देखील करून देत नाही. विमा कंपन्यांना फायदा मिळवून दिला जातोय. शेतकऱ्यांच्या जीवावर हजारो विम्या कंपन्यांना फायदा करून देण्यात आलाय. पण शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले गेले नाहीत. या अर्थसंकल्पात ना विकासाला चालना, ना कोणत्या कल्याणकारी उपाय योजना, ना कोणतीही नवीन दिशा नाही, असा निशाणाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला आहे.
हेही वाचा -Maharashtra Budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान