मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील सध्याच्या स्थितीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नंतर सांगितले.
आमची भूमिका आम्ही मांडली - थोरात
काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आणि आम्ही एकत्र बसलो होतो. आमची भूमिका होती ती आम्ही या बैठकीत मांडलेली आहे. एकत्र बसून सध्याच्या स्थिती बद्दल आम्ही चर्चा केली असे बाळासाहेब थोरात यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात दिल्ली हायकमांडने अहवाल मागविला आहे. या अहवालावर चर्चेसाठीच ही बैठक बोलाविण्यात आली होती.
परमबीर प्रकरणावरून बैठक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचा दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांडने या सर्व घटनेवर राज्यातील काँग्रेस मंत्र्यांकडून अहवाल मागविला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनी हा अहवाल तयार केला असून यावर चर्चेसाठीच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते. हा अहवाल नंतर दिल्ली हायकमांडला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.