मुंबई - निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची धामधुम आज थांबणार आहे. प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी सर्व उमेदवार आणि पक्षांनी नियोजन केल्याचे दिसत आहे. मात्र, जाहीर प्रचार संपणार असला तरी रविवारच्या सुटीमुळे उमेदवारांचा छुपा प्रचारावर जोर राहणार आहे.
हेही वाचा...पाऊस.. प्रचार अन् पवार...
अत्यंत चुरशीने लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. गेले महिनाभर आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळे या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा मोठा धुराळा उडालाय. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे प्रश्न मात्र बाजुला पडलेत. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवत निवडणुक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. मोदींसोबत भाजपने राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांची मोठी फौजच रणांगणात उतरवली.
हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?
भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या. तर सेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा घेण्यात आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजस्थानचे मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, प्रवक्ते सचिन सावंत आदींनी प्रचारार्थ सभा घेऊन रान उठविले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्याही विविध ठिकाणी सभा झाल्या आहेत. मनसेकडून राज ठाकरे, वंचितकडून प्रकाश आंबेडकर, एमआएमकडून असुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील यांनी सभा घेतल्या आहेत.