मुंबई -राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती भीषण होत चालली आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत दररोज सरासरी 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतो आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर संबंधित महापालिका अथवा स्थानिक प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर कशा पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात, अंत्यसंस्कार करताना काय काळजी घेतली जाते? याबाबत महिती दिली आहे नायर हॉस्पिटलचे अधिष्ठता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी.
डॉक्टर शैलेश मोहिते याबाबत माहीती देताना म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या मुंबई महानगरपालिका रुग्णांच्या बाबतीत विशेष काळजी घेत आहे. मंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर देखील कमी आहे. दिवसाला सरासरी 30 ते 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतो. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला प्रथम एका प्लॅस्टिकच्या बॉडीबॅगमध्ये ठेवलं जातं बॉडीबॅगच्या वरचे कव्हर हे ट्रान्सपरंट असतं जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल. त्यानंतर मृतदेहाला ॲम्बुलन्समधून स्मशानभूमीमध्ये नेले जाते. रुग्णाला त्याचा जो धर्म असेल त्या धर्माच्या स्मशानभूमीमध्ये त्याला नेले जाते, त्यानंतर मृत शरीराला विद्युत दाहिनीमध्ये ठेवून डिस्पोजल केले जाते, मृतदेहावर अत्यसंस्कार करताना महापालिकेचे कर्मचारी संपूर्ण खबरदारी घेतात, कोरोना नियमांचे पालन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात.