महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जागतिक टपाल दिन : तंत्रज्ञानाच्या युगातही भारतीय पोस्टाने जपलीय विश्वासाहर्ता; लाल पेटीला आजही नागरिकांची पसंती

लोकांच्या विश्वास संपादन करणाऱ्या पोस्टल सेवेचा 9 ऑक्टोबर हा स्थापना दिवस. हा दिवस जागतिक टपाल दिन किंवा 'वर्ल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यात 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मुंबईचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली.

By

Published : Oct 9, 2021, 7:33 AM IST

Updated : Oct 9, 2021, 9:16 AM IST

जागतिक टापाल दिन
जागतिक टपाल दिन

मुंबई - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर आणि मोबाईलवरून संदेश वहन काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात करता येते. मात्र प्रगत आणि अद्यावत तंत्रज्ञान प्रणाली उपलब्ध असली तरी आजही महत्वाची कागदपत्रे, पेन्शन पोहोचवण्याचे काम पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पार पाडले जात आहे. नागरिकांकडूनही पोस्टाच्या सेवेला मोठ्या विश्वासाने पसंती दिली जाते. आपल्या सेवेतून लोकांच्या विश्वास संपादन करणाऱ्या पोस्टल सेवेचा 9 ऑक्टोबर हा स्थापना दिवस. हा दिवस जागतिक टपाल दिन किंवा 'वर्ल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यात 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती मुंबईचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली.

युनिवर्सल पोस्टल युनियन -


युनिवर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी 'बर्न' येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. 1 जुलै 1876 ला भारत 'युनिवर्सल पोस्टल युनियन' चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे यानिमित्ताने 9 ऑक्टोबरपासून 'पोस्टल विक' पाळला जातो.

1774 मध्ये कोलकाता येथे मुख्य पोस्ट ऑफिस -


आपल्या देशात 18 व्या शतकाआधीपासून टपाल सेवा सुरू होती. 1766 मध्ये लॉर्ड क्लाइव यांनी स्थापन केलेल्या टपाल व्यवस्थेचा विकास वारेन हेस्टिंग्स यांनी 1774 मध्ये कोलकत्ता येथे मुख्य पोस्ट ऑफिस सुरू करून केला. चेन्नई मधील जनरल पोस्ट ऑफिस 1786 मध्ये तर मुंबई जनरल पोस्ट ऑफिस 1793 मध्ये सुरू करण्यात आले. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात 23,344 पोस्ट ऑफिस होती. त्यापैकी 19,184 पोस्ट ऑफिस ग्रामीण विभागात तर 4,160 पोस्ट ऑफिस शहर विभागात होती. भारतात सध्या एकूण 1,55,531 पोस्ट ऑफिस आहेत. भारत हा सर्वात मोठा पोस्टल नेटवर्क बनला आहे. महाराष्ट्रात 23784 पोस्ट ऑफिस असून त्यामध्ये सुमारे 37 हजार पोस्टमन व कर्मचारी काम करत आहेत.

टपाल तिकिटांचा इतिहास -

भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये 1852 मध्ये झाली. 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले. भारतातले पहिले रंगीत तिकीट 1931 मध्ये छापण्यात आले. 1947 मध्ये पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट निघाले, त्यावर भारतीय झेंडा होता. त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची छपाई सुरू झाली. काही वर्षांपूर्वी, नागरिकांच्या निवडीनुसार तिकिटं छापण्याची सुरुवात टपाल खात्यानं प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.

पोस्टल सप्ताह -

जागतिक पोस्टल दिनाचे औचित्य साधत राज्यात 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रीय पोस्टल सप्ताह' निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त 11 ऑक्टोबरला 'बँकिंग दिवस', 12 ऑक्टोबरला ‘पोस्टल जीवन वीमा दिवस’, 13 ऑक्टोबरला ‘फिलॅटली दिवस’, 14 ऑक्टोबरला ,'व्यवसाय विकास दिवस', 16 ऑक्टोबरला 'मेल दिवस', 17 ऑक्टोबरला पोस्टल सेवा पुरस्कार 2021 दिले जाणार आहेत. अशी माहिती मुंबईचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली.


पोस्टाच्या विविध सेवा -
- 1774 मध्ये भारतात पाहिले पोस्ट ऑफिस कोलकत्ता येथे सुरू झाले.

- 1986 मध्ये भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली.

- 1880 मध्ये मनी ऑर्डर सेवा सुरू झाली

- 2018 मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू झाली.

हेही वाचा - टपाल खात्याचे बदलते स्वरूप; डाक सेवेसह आता बँकिंगची सेवाही घरपोच

हेही वाचा - भारतीय पोस्टाच्या लिफाफ्यावर मालदांडीचे चित्र; मंगळवेढ्याच्या ज्वारीला देणार प्रसिद्धी

Last Updated : Oct 9, 2021, 9:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details