मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग, परिवहन आणि गुंतवणणूक या विषयीच्या कार्यक्रमात बोलत असताना आपला जुना एक १९९५ सालचा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, मी राज्यमंत्री असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या कामासाठीचे रिलायन्स कंपनीचे एक टेंडर रद्द केले होते. त्यावेळी धीरुभाई अंबानीही तेथे होते, ते माझ्यावर फार संतापले होते. मात्र मी ते टेंडर रद्द केलं अन् तत्कालीन सरकारचे 2000 कोटी रुपये वाचवले ( Union Minister Nitin Gadkari on Reliance Tender ) होते.
'बोलला आहात ते करून दाखवा'
मुंबईतील आजचं हे संमेलन मला १९९५ सालच्या माझ्या राज्यमंत्री या कारकिर्दीची आठवण करुन देत आहे. त्यावेळी, मी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या कामासाठीचे रिलायन्स कंपनीची निविदा रद्द केली होती. हे करत असताना मी कुणाचाही विचार केला नाही. त्यावेळी, धीरुभाई अंबानी तेथे होते, ते माझ्यावर फार संतापले होते. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे हेही माझ्यामुळे रागावले होते. आपण असं का केलं, हे त्यांनी मला विचारलं होत. त्यावेळी, आपण या योजनेसाठी आणि बांद्रा-वरळी सी लिंकसाठी लोकांकडून पैसे जमवू असे मी म्हटलं. तेव्हा सगळेच माझ्यावर हसले होते. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी मला म्हणाले की आता बोलला आहेत ते करून दाखवा.
वाचवले तब्बल २००० कोटी
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामासाठी रिलायन्सने 3600 कोटी रुपयांचा हवाला दिला होता. त्यामुळे ते टेंडर आम्ही रद्द केले आणि एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ) च्या माध्यमातून तेच काम 1600 कोटी रुपयांत पूर्ण केलं. त्यावेळी एमएसआरडीसीचा संस्थापक अध्यक्ष मी होतो. या कामातून आम्ही 2000 कोटी रुपये वाचवले. राज्य सरकारने या योजनेचे मुद्रीकरण केले त्यावेळी आम्हाला 3000 कोटी रुपये मिळाले. दीड वर्षापूर्वी आम्ही पुन्हा एकदा या कामाचे टेंडर दिले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारला 8000 कोटी रुपये मिळाले असे त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.