मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day) लाखो आंबेडकर अनुयायी देशभरातून चैत्यभूमी येथे दाखल होतात. दोन दिवस आगोदरच या वास्तूजवळ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येऊ लागतात. बाबासाहेब यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जातीचा असो, तो या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. ६ डिसेंबरच्या (6 December Mahaparinirvan Day) रात्रीपर्यंत तसेच वातावरण असते.
नेमकं ही वास्तू कशी तयार झाली? -
सहा डिसेंबरच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे दाखल होतात. मात्र, ही वास्तू उभी राहण्यासाठी बाबासाहेबांचे पुत्र यशवंत यांनी विशेष मेहनत घेतली. बाबासाहेब गेल्याची दुःखद बातमी मिळाल्यानंतर माई साहेबांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, पुरेसे पैसे नसल्यामुळे समस्या कायम होती. त्यावेळी मंत्री असलेले बाबू जगजीवन राम यांनी पाच लाखांची मदत केली. दिल्लीमध्ये बाबासाहेबांचे पार्थिव हे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळच्या विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आले. बाबासाहेबांचे अंत्यसंस्कार मुंबईत होणार होते आणि राज्यातील लाखो अनुयायी या ठिकाणी मिळेल, त्या वाहनाने धाव घेतली होती. बाबासाहेब यांचे अंत्यसंस्कार मुंबईत कुठे करायचे? हा प्रश्न बाबासाहेब यांच्या निकटवर्तीयांच्या समोर उभा राहिला होता. त्यानंतर बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कार समुद्राच्या किनारी झाले पाहिजे, असे ठरविण्यात आले. त्यानंतर चैत्यभूमी या जागेची निवड करण्यात आली आणि अंत्यसंस्कारासाठीच्या जागेची समस्या सोडवली. अंत्यसंस्कारापूर्वी लाख अस्पृश्यांनी बाबासाहेबांच्या चितेच्या साक्षीने धर्मांतर केले. त्यानंतर चितेला अग्नी दिला. या जागेवरच वास्तु उभारण्याचा संकल्प बाबासाहेब यांचे चिरंजीव यशवंत आंबेडकर यांनी केला. यासाठी एका संस्थेची स्थापना करण्यात आली. निधी गोळा करण्यासाठी यशवंत यांनी भारतभ्रमण केले. यासाठी एक विशेष रथ तयार करण्यात आला होता. एक वास्तू बांधण्याएवढा निधी गोळा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चैत्यभूमी परिसरात वास्तू बांधण्याचे ठरवले. त्यानुसार एक वास्तू बांधून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या वास्तूत ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर एकवटतात. आज हे ठिकाण ऊर्जेचे सूत्र समजले जाते.