महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Rain : ट्रेन बंद पडल्यास बेस्टच्या ४०० बसेस, धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी निवारा

By

Published : Jul 15, 2022, 6:56 PM IST

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. यामुळे प्रवाशांना त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट आणि एसटी बसेस चालवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार बेस्टने ४०० तर एसटीने ११ बसेस चालवण्याची तयारी दर्शवली आहे.

best
best

मुंबई - मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. यामुळे प्रवाशांना त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्ट आणि एसटी बसेस चालवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार बेस्टने ४०० तर एसटीने ११ बसेस चालवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच धोकादायक इमारतीमधील नागरिकांना पावसाळ्याच्या दरम्यान पर्यायी निवार देण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार पर्यायी निवारा देण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

आढावा बैठक -बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) , संबंधित खाते प्रमुख यांच्यासह बेस्ट उपक्रम, मध्य व पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) इत्यादी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्यावर संबंधित प्रशासनाना पालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

ट्रेन बंद पडल्यास बेस्टच्या ४०० बस -पावसाळ्यादरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना योग्य ती मदत वेळच्यावेळी मिळावी, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशाप्रसंगी प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहोचता यावे, यासाठी एसटी व बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या अनुषंगाने ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ (SOPs) बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. अशा प्रसंगी नागरिकांच्या सुविधेसाठी ४०० जादा बसेस सोडण्याची बेस्टची तयारी, तर ११ जादा बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लोकल ट्रेन बंद असण्याच्या परिस्थितीत प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार व इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह आवश्यक ती मदत योग्यप्रकारे मिळावी, यादृष्टीने महानगरपालिकेच्या विभागांनी त्यांच्या स्तरावर मॉक ड्रील आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

२४ तासात खड्डे बुजवा -मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान खड्डे पडतात. खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असू नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यादरम्यान खड्डे भरताना प्राधान्याने ‘कोल्डमिक्स’ साहित्य वापरले जाते. तथापि, पावसाळ्यादरम्यान पाऊस नसण्याच्या दिवशी अन्य प्रकारचे साहित्य निर्धारित पद्धतीनुसार उपयोगात आणण्याचे निर्देश. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमितपणे पाहणी करण्याचे व पाहणी दरम्यान आढळून आलेल्या खड्ड्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सप्टेंबर अखेरपर्यंत तात्पुरता निवारा -अति धोकादायक इमारतींमध्ये (C1 Building) राहणा-या रहिवाशांच्या जीविताची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश व त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणा-या रहिवाशांनी सदर इमारत रिकामी करावी, यासाठी महापालिकेद्वारे सातत्याने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार आवश्यकती कार्यवाही व कारवाई देखील नियमितपणे करण्यात येत आहे. त्यानुसार अति धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तात्पुरत्या निवा-यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. एकंदरीत आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि नागरी सेवा-सुविधांबाबत अधिकाधिक परिपूर्ण व अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राचे संबंधित खासदार व आमदार यांच्याशी नियमितपणे संपर्क साधण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details